सरसगड- वनडे ट्रेकिंग स्पॉट्स
पावसाच्या सरी बरसल्या म्हणजे पृथ्वी हिरवी शाल पांघरते अन् आकर्षक सौंदर्याने पर्यटकांना वेड लावते. हिरवळीने नेटलेली डोंगराई पर्यंटकाना खुणावत असतात. ऊन- पावसाच्या खेळात पर्यटकांसोबत रंगाणार व धुक्यात हरवणारा गगनचुंबी डोंगर म्हणजे रायगड जिल्ह्यातील पाली गावानजिक असलेला 'सरसगड' होय. पावसाळा असो वा हिवाळा येथे पर्यटकांची खूप गर्दी असते. सरसगड येथे पर्यटक वनडे ट्रेकिंग करण्यासाठी येत असतात.पाली या गावी अष्टविनायकांपैकी एक असलेला 'बल्लाळेश्वरा'चे मंदिर आहे. पाली या गावाच्या शेजारीच 'वन डे ट्रेकिंग स्पॉट्स' अर्थात हा सरसगड आजही शिवरायाच्या स्मृती जागृत करून देतो. पालीला जातानाच रस्त्याने या भल्या मोठ्या गडाचे दर्शन घडते. समुद्र सपाटीपासून गड सुमारे 1600 फूट उंच आहे. परिसरराची टेहाळणी करण्यासाठीच शिवरायांनी सरसगडाची निवड केली होती. १३ व्या शतकात सिंहगड, तोरणा, पुरंदर किल्ले जिंकून घेतल्यावर निजामशाहीचा संस्थापक मलिक अहमदचे कोकणात आगमण झाले. त्यावेळी सरसगड हा किल्ला त्याच्या ताब्यात होता. त्यांनतर शिवरायांनी सरसगडावर स्वारी करून तो काबिज केला. स्वतंत्र्य मिळण्याआधी हा गड 'भोर' संस्थानाच्या ताब्यात होता. त्यांनतर शिवरायांनी सुमारे दोन हजारांपैक्षा जास्त मजुर लावून या गडाची डागडुजी करून घेतली होती.
एक दिवसाच्या ट्रेकिंगसाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येने येत असतात. पुणे, रायगड तसेच महाराष्ट्रातील शालेय सहली येथे येत असतात. पालीच्या बल्लाळेश्वराचे दर्शन घेऊन मंदिरा मागील सत्याने 96 पायर्या चढून पर्यटक गडावर चढायला प्रारंभ करतात. पायर्यांच्या शेजारून ओढा असल्याने पर्यटक पाण्याने चिंब होऊन धम्माल करत साधारण तासाभरात गडावर पोहचतात.पावसाळ्यात मुंबईकर व पुणेकर विकेण्डला पाली येथे अर्थात सरसगडावर वनडे पिकनिकसाठी स्वारी करतात. 'ट्रेकर' हे गड चढून पर्यटनाची हौस भागवितांना दिसतात. गडावरून दूरपर्यंत टेहळणी करता येते. स्वराज्य मिळवून देण्यासाठी या गडाचे मोठे योगदान लाभल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो.
सरसगडावर चढतानाच हिरवा शालू नेसलेला सभोवताचा परिसर पाहूनच गड किती विलोभनीय आहे, याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. गडावर पाण्याचा मुबलक साठा आहे. प्रथम दर्शनी असलेल्या दिंडी दरवाजाला लागूनच तिहेरी तटबंदी आपले लक्ष वेधून घेते. तटबंदीच्या डाव्या बाजूला पाण्याचा मोठा हौद आहे. त्यात बारामाही पाणी असते. पूर्वी येथून एक भुयारी मार्ग होता. मात्र आता अस्तित्वात नाही. 'मोती हौद' ही मोठा आहे. त्याच्या उजवीकडे बालेकिल्ल्याचा पायथा लागतो. मात्र बालेकिल्ल्यावर पाहण्यासाठी काही विशेष नाही. त्याच्या समोरच पुन्हा एक हौद आहे. त्या हौदाच्या शेजारी शहापीराचे थडगे दिसते. वैशाख पौर्णिमेला गडावरील शहापीराचा उरूस भरतो. केदारेश्र्वराचे मंदिर आहे. शिवरात्रीला केदारेश्र्वराला भाविकांची गर्दी असते.कसे जाल? पाली येथे जाण्यासाठी मुंबई, पुणे, रायगड येथून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसेस असतात. मुंबईहून पनवेल, खोपोली येथे रेल्वेनेही पोहचता येते.