Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्रकर्ता राजा शिवाजी

महाराष्ट्रकर्ता राजा शिवाजी
MH GovtMH GOVT
शिवाजीमहाराजांमुळे महाराष्ट्रातील लोकांचे एक राष्ट्र बनले आणि त्याने आपल्या पराक्रमाने स्वातंत्र्य प्राप्त केले. महाराष्ट्राच्या अंगचे धैर्य, शौर्य, चिकाटी इत्यादी गुण जगाच्या निदर्शनास येण्यास आणि सर्वत्र त्याचे नाव दुमदुमण्यास महाराजांचा राज्यस्थापनेचा उद्योग कारण झाला. महाराष्ट्रात अनेक जाती व अनेक पंथ आहेत. परंतु महाराजांनी त्यांच्यातला विस्कळीतपणा घालवून त्या सर्वात ऐक्यभाव उत्पन्न केला ही त्यांची सर्वांत फार मोठी कामगिरी झाली. प्रत्येक व्यक्तीची स्वत:संबंधीची आणि समाजासंबंधीची अशी दोन कर्तव्ये असतात. या दोन कर्तव्यांचा विरोध टाकून दोन्हींचा समन्वय कसा साधावा हे महाराजांनी महाराष्ट्राला शिकविले. प्रत्येकाने आपल्या घरी आपले जातिधर्म पाळावे. परंतु सार्वजनिक जीवनात त्याने समाजहित साधलेच पाहिजे असा त्यांचा दंडक आहे.

शिवकालीन राजकीय व सामाजिक स्थित्यंतर
देशाभिमान किंवा देशप्रेम हा गुण आपल्या भारतात माहीत नव्हता. तो गुण महाराजांनी उत्पन्न केला व वाढीस लावला. त्यांनी थंडगोळ्याप्रमाणे अचेतन असलेल्या महाराष्ट्रात चैतन्य ओतले. महाराजांच्या वेळचा समाज जिवंत होता. त्याला स्वत:च्या कर्तव्याची जाणीव होती. म्हणून आलेल्या संकटांना धैर्याने तोंड देऊन त्यांनी महाराष्ट्राचे संरक्षण केले. एखादा गुण अंगी मुरण्यास कालावधी लागतो. सतराव्या आणि अठराव्या शतकात देशाभिमानाचा गुण महाराष्ट्राच्या अंगी मुरला.

महाराष्ट्रावर मोगलांशी युद्ध करण्याचा प्रसंग आल्यामुळे त्याच्या ठिकाणची राष्ट्रीय वृत्ती अतिशय बळकट व चिवट झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना बंधुभावाने एकत्र येऊन काम करण्याची सवय लागली. आणि सहकाराने कामे पार पाडण्याची व परस्परांना साहाय्य करण्याची त्यांची शक्ती आपोआप प्रकट झाली. यापुढे आपण जबाबदारीने महत्कार्ये पार पाडू शकू असा आत्मविश्वास त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाला. त्याच्या भरवशावर त्यांनी पुढे एक शतक भारतावर प्रभुत्व गाजविले. तेव्हा ते जात्याच शूर, साहसी, काटक, धैर्यवान, राजकारणी, उत्साही, त्यागी, आणि निर्भय असल्याचे जगाच्या निदर्शनास आले. मुसलमानांनी सर्वांना जिंकले, परंतु महाराष्ट्रापुढे त्यांना हात टेकावे लागले. त्यांच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घालण्यात एकटे मराठे यशस्वी झाले.

webdunia
MH GovtMH GOVT
स्वराज्य स्थापन केले ते कायम टिकले पाहिजे. यासाठी महाराजांनी किल्ले आणि फौज यांची कायमची व्यवस्था लावून दिली होती. महाराजांचा सरंजाम देण्याच्या बाबतीत कटाक्ष होता. सरंजामाविषयी महाराजांच्या तालमीत वाढलेला रामचंद्रपंत अमात्य लिहितो- ''राज्यातील वतनदार देशमुख व देशकुलकर्णी, पाटील आदीकरून स्वकल्प परंतु स्वतंत्र्य देशनायकच आहेत. आहे देश इतक्यावर कालक्रमणा करावी, ही यांची बुद्धी नाही. परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशेने अगोदर सलूख करतात, स्वत: भेटतात, तिकडील भेद इकडे, इकडील भेद तिकडे करून राज्यात शत्रूचा प्रवेश करितात.''

महाराजांची लूट केली ती परमुलखात केली. नवीन राज्य स्थापन करताना असा प्रकार व्हावयाचाच. कारण फौजफाट्याचा खर्च भागविणे आवश्यक असते. मात्र या लुटीत महाराजांनी कुराण, मशीद, स्त्रिया, मुले इत्यादिकांना हात लावला नाही.

(महाराष्ट्राच्या जीवनातील स्थित्यंतरे पुस्तकातून साभार)

Share this Story:

Follow Webdunia marathi