Publish Date: Mon, 04 Apr 2016 (11:36 IST)
Updated Date: Mon, 11 Apr 2016 (16:06 IST)
भीषण दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या लातूर जिल्ह्याला रेल्वेने पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या दोन गाड्या तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. या दोन्ही गाड्या १५ एप्रिलपर्यंत पाण्याच्या वाहतुकीसाठी सज्ज होतील.
देशाच्या विविध भागांमध्ये पाण्याच्या वाहतुकीसाठी रेल्वेगाड्या उपलब्ध करून देण्याचे सर्वंकष निर्देश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालयास दिले असून त्यानुसारच लातूरसाठी ही सोय करण्यात येत आहे. याआधी राजस्थान सरकारने केलेल्या विनंतीनुसार उत्तर पश्चिम रेल्वेच्या अजमेर विभागात नसिराबाद ते भिलवाडा या १०९ किमी मार्गावर पाण्याच्या वाहतुकीसाठी अशाच प्रकारे जानेवारीपासून अनेक रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या असून ती सोयही उन्हाळा संपेपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
लातूरला रेल्वेने प्रत्येकी ५० टँकरवाघिणींच्या दोन मालगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या दोन गाड्यांनी एका फेरीत ५५ लाख लिटर पाणी आणता येईल. या दोन रेल्वेगाड्या मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात पंढरपूर-लातूर या २७५ किमी मार्गावर पाण्याच्या वाहतुकीसाठी चालविल्या जातील. स्थानिक प्रशासनाच्या गरजेनुसार गाड्यांच्या फेऱ्या ठरविल्या जातील. कोटा कार्यशाळेतून स्वच्छ धुतलेल्या ५० टँकरवाघिणींची पहिली रेल्वेगाडी ८ एप्रिलला व दुसरी रेल्वेगाडी १५ एप्रिलपर्यंत उपलब्ध होईल.