Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात ६२% मतदान; २२ ला मतमोजणी

राज्यात ६२% मतदान; २२ ला मतमोजणी

वेबदुनिया

महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांकरीता आज राज्यभरात एकूण सुमारे ६२% मतदान झाले अशी प्राथमिक माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली.

लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आज झालेल्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तरीही हे प्रमाण असमाधानकारक आहे. लोकसभा निवडणूकीत राज्यात एकूण ५६% मतदान झाले होते. तर २००४ च्या विधानसभा निवडणूकीत ६४% मतदान झाले होते.

येत्या २२ ऑक्टोबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे दिवाळीचा राजकीय बंपर धमाका कोणास लागतो याकडे महाराष्ट्राच्या जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.लोकसभा निवडणूकीनंतर लगेचच झालेली ही विधानसभेची निवडणूक महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ करणारी ठरणार आहे असे बोलले जाते.

आज झालेल्या निवडणूकीत मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, कॉग्रेस नेते नारायण राणे, अमरावतीमधून बंडखोर डॉ. सुनील देशमुख आणि राष्ट्रपतीपुत्र रावसाहेब शेखावत, गुहागरमधुन बंडखोर डॉ. विनय नातू आणि विरोधी पक्षनेते रामदास कदम, भाजप नेते एकनाथराव खडसे या प्रमुख मात्तबर नेत्यांसह काही बड्या नेत्यांच्या वारसांचेही भाग्य इलेक्टॉनिक मशिनमध्ये बंद झाले आहे.

राज्यभरात आज झालेले मतदान काही ठिकाणचा अपवाद वगळता शांततेत पार पडले. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाईमुळे २३ मतदान केंद्रावर मतदान होऊ शकले नाही. नक्षलवाद्यांनी आज सकाळीच मतदान केंद्रावर हल्ला चढविला. मात्र ऐनवेळी जादा कुमक पाठवून हा हल्ला पोलिसांनी परतवून लावला. सिंधुदुर्ग येथे पावसाने काही काळ हजेरी लावल्याने मतदार घराबाहेर पडले नाहीत.

पुणे जिल्ह्यात आंबेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेच्या उमेदवार कल्पना अढळराव पाटील यांच्या समर्थकांत हाणामारी झाली. यात नऊ वाहने फोडली गेली. कोकणात कुडाळ मतदारसंघात कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या समर्थकांनी आपल्याला पिस्तूल दाखविले असा आरोप करत शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी तक्रार नोंदवली आहे. अमरावतीत शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी भाजपच्या कार्यकर्त्यावर पिस्तूल रोखल्याने खळबळ उडाली.

नवी मुंबईत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गणेश नाईक व शिवसेनेचे उमेदवार विजय चौगुले आमनेसामने आल्यानंतर दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. इतरही काही मतदारसंघात किरकोळ प्रकार घडले. पण ते अपवादात्मकच. बाकी मतदान शांततेतच पार पडले.

मुंबईत घाटकोपर येथे मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक घडली. सोलापुर पश्चिम आणि नंदुरबार येथेही हाणामारीच्या घटना घडल्या. मात्र पोलिसांनी वेळेच हस्तक्षेप केल्याने येथील मतदान पुन्हा शांततेत सुरू झाले.

राज्यातील सायंकाळी पाच वाजेपर्यंतची मतदानाची प्राथमिक टक्केवारी पुढील प्रमाणे-

नंदूरबार- ६२ टक्के, धुळे- ४५ टक्के, जळगाव- ५४ टक्के, बुलडाणा- ६४ टक्के, अकोला- ५२ टक्के, वाशिम- ५४ टक्के, अमरावती- ६० टक्के, वर्धा- ६० टक्के, नागपूर- ५५ टक्के, भंडारा- ६५ टक्के, गोंदिया- ६३ टक्के, गडचिरोली- ५० टक्के, चंद्रपूर- ६० टक्के, यवतमाळ- ५५ टक्के, नांदेड- ६५ टक्के, हिंगोली- ६५ टक्के, परभणी- ६० टक्के, जालना- ६० टक्के, औरंगाबाद- ६० टक्के, नाशिक- ५५ टक्के, ठाणे- ४८ टक्के, मुंबई उपनगर- ४३ टक्के, मुंबई शहर- ५० टक्के, रायगड- ६० टक्के, पुणे- ५५ टक्के, अहमदनगर- ५५ टक्के, बीड- ६० टक्के, लातूर- ६० टक्के, उस्मानाबाद- ६५ टक्के, सोलापूर- ५५ टक्के, सातारा- ५२ टक्के, रत्नागिरी- ६३ टक्के, सिंधुदुर्ग- ६० टक्के, कोल्हापूर- ७२ टक्के, सांगली- ६० टक्के.

Share this Story:

Follow Webdunia marathi