'रिडालोस' चे जागावाटप जाहीर
रिपाइं सर्वाधिक ८५ जागा लढविणार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाइं) नेते माजी खासदार रामदास आठवले यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या रिपब्लिकन डावी लोकशाही समितीने (रिडालोस) आज विधानसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २८८ जागा लढविण्याची घोषणा केली आणि त्यापैकी २०० जागांचे वाटपही जाहीर केले. दरम्यान ओबीसी सेना या आणखी एका नव्या पक्षाचा उदय झाला असून ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी भूमिका घेऊन विधानसभेच्या निवडणूकात १०५ जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय या पक्षाने घेतला आहे.
रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे, डॉ. राजेंद्र गवई, नामदेव ढसाळ, कॉ. डॉ. अशोक ढवळे, प्रताप होगाडे आदी नेत्यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी आपल्या १७ घटक पक्षांमधील जागावाटप जाहीर करून रिडालोसने इतर आघाड्या व राजकीय पक्षांवर आघाडी घेतली आहे. उर्वरित ८८ जागांच्या वाटपाबद्दल सध्या चर्चा सुरू असून येत्या दोन तीन दिवसातच याबद्दल निर्णय होईल असे आठवले म्हणाले. रिडालोसच्या घटकपक्षांनी आपापल्या निवडणूक चिन्हावर लढण्याचे ठरविण्यात आले आहे. ज्यांच्याकडे चिन्ह नाही, त्या सर्वांसाठी एक समान चिन्ह मिळविण्याचा प्रयत्नही केला जाणार आहे असेही आठवले यांनी स्पष्ट केले. रिडालोसच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारून आठवले, कवाडे व गवई या तीनही नेत्यांनी या निवडणुकीत उभे न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या २०० जागांपैकी सर्वाधिक ८५ जागा ऐक्य झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या वाट्याला गेल्या आहेत. रिडालोसमधील इतर घटक पक्षांपैकी समाजवादी पार्टीला २१, राष्ट्रीय समाज पक्षाला १७ व जनता दल (धर्मनिरपेक्ष) ला १५ जागा देण्यात आल्या आहेत. याशिवाय शेकाप व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना प्रत्येकी १३, माकप १२, भाकप १०, लोकभारती ५, प्रहार संघटना २ आणि लोक राजनीती मंच, समाजवादी जनपरिषद, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लोकसंघर्ष मोर्चा, लोकजनशक्ती पार्टी, युवक क्रांती दल व महाराष्ट्र विकास आघाडी यांना प्रत्येकी एक, अशा प्रकारे जागावाटप करण्यात आले आहे. तसेच समितीचा जाहीरनामा १४ सप्टेंबरला प्रसिद्ध केला जाईल, असेही यावेळी रिडालोसच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
रिडालोसची पहिली जाहीर सभा शनिवारी, १२ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता शिवाजी पार्कवर होणार असून, या सभेत डाव्या आघाडीचे अनेक राष्ट्रीय नेते सहभागी होणार आहेत. यात माजी पंतप्रधान देवेगौडा, कॉ. ए. बी. बर्धन, कॉ. सीताराम येचुरी, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान यांच्यासह प्रा. एन. डी. पाटील, भाई वै, खा. राजू शेट्टी आदी समितीचे नेतेही मार्गदर्शन करतील, असे यावेळी सांगण्यात आले.