Publish Date: Wed, 28 Aug 2019 (10:23 IST)
Updated Date: Wed, 28 Aug 2019 (10:24 IST)
'राज्यातील विरोधी पक्षांचे १७ आमदार सध्या आमच्याकडे प्रवेशासाठी रांगेत उभे आहेत. येत्या ३१ तारखेला त्यातील चार जण भोकरदन येथे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत,' असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे-पाटील यांनी केला आहे.ते पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. अजित पवार यांच्याजवळ आता कोणताच झेंडा शिल्लक राहिलेला नाही. त्यांच्या झेंड्याचा दांडाच आमच्या हातात आला आहे. त्यांच्या जवळचे लोक भगव्या झेंड्याकडे आले आहेत. आम्ही खूप दिवसांपासून त्यांना भगव्याबद्दल सांगत होतो. पण ऐकत नव्हते. आता लोकांनीच भगवा कसा असतो ते दाखवून दिलं,' असं दानवे म्हणाले. 'विरोधी पक्षाचे अनेक आमदार प्रवेशासाठी इच्छुक आहेत. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह हे राष्ट्रवादीच्या सभेला उपस्थित नव्हते यावरून काय ते समजा,' असंही ते म्हणाले.