Publish Date: Thu, 05 Sep 2019 (10:19 IST)
Updated Date: Thu, 05 Sep 2019 (10:20 IST)
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या पक्षाचे उमेदवार यंदाच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर लढणार आहेत. कारण कमळ चिन्हावर निवडणुका लढवण्यासंदर्भात सकारात्मक विचार केला जात असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीच दिली आहे. भाजपाचे कमळ चिन्ह घेऊन निवडून येणार्या रिपब्लिक आमदारांचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही आठवले यांनी म्हटले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत रिपाइं पक्षाला दहा जागा देण्याची मागणी रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. या आपल्या मागणीला दोन्ही नेत्यांनी सकरात्मक प्रतिसाद दिल्याचेही आठवले यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजपा आगामी विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांना 18 जागा सोडणार आहे. त्यापैकी 10 जागा आमच्या पक्षाला मिळतील, अशी अपेक्षा आठवले यांनी व्यक्त केली आहे.