Publish Date: Tue, 14 Feb 2017 (16:34 IST)
Updated Date: Tue, 14 Feb 2017 (16:36 IST)
शिवशंकराला देवांचा देव महादेव मानतात. महादेवाचे मंदिर नाही, असे गाव भारतात शोधून देखील सापडणार नाही. देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशकंराची आराधना केली जाते. 'हर हर महादेव...', अशा जयघोषात शिवाचे भाविक तल्लीन होऊन जातात. सदाशिव, सांब, महेश, मंगेश, गिरिजापती, पार्वतीपती, भूतनाथ, नीलकंठ, चंद्रमौली, आशुतोष व महादेव असे नामस्मरण करून भाविक चराचरात सामावलेल्या शिवशंकराचा धावा करीत असतात. शिव हे दैवत मंगलमय, कल्याण करणारे असून त्यांच्यावर भाविकांची अपार श्रध्दा आहे. शिवकृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे दुःख येत नाही, अशी श्रद्धा आहे.
ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे. विष्णू सृष्टीचा पालनकर्ता. शंकर तिचे संरक्षण करणारा आहे. यामुळेच भोलेनाथाला 'कैलासनिवासी' असे म्हटले जाते.
'आशुतोष' म्हणचे तत्काळ संतुष्ट होणारे. शिव तसाच आहे. समुद्र मंथनात निघालेले विष स्वत: प्राशन करून जगाचे कल्याण करणार्या शिवाला 'नीळकंठ' असेही संबोधले जाते. शिवाच्या मस्तकावर गंगा व चंद्र यांचे स्थान आहे. म्हणून त्यांना 'त्र्यंबकेश्वर' असेही म्हणतात. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रामध्ये सर्व प्रकारचे दु:ख नष्ट करण्याची शक्ती आहे.
'शिव' म्हणजे पापाचा नाश करणारे, त्या आधी असणारा 'नमः' हा शब्द मोक्ष प्रदान करणारा आहे. उमा-महेश्वर हा देवादी देव महादेव आहे. 'नम: शिवाय' या पाच अक्षरी मंत्रात अद्भुत सामर्थ्य असून तो जगाचे कल्याणासाठी सार्थ ठरला आहे.
शिवाला बेलपत्र प्रिय:
एका कथेनुसार...एकदा विष्णुची पत्नी लक्ष्मीने श्रावण मासात शिवलिंगावर प्रतिदिन 1001 पांढरे कमळाची फुले वाहण्याचे व्रत करण्याचे ठरविले. लक्ष्मीने परडीत मोजून कमळे ठेवली. मात्र मंदिरात पोहचल्यानंतर तीन कमळाची फुले कमी भरली. त्याचे लक्ष्मीला आश्चर्य वाटले. त्यानंतर तिने फुलांवर पाणी शिंपडले आणि चमत्कार झाला. फुलांमधून एक रोपटे बाहेर आहे. त्याला त्रिदलासारखी पाने त्याला होती. ते बेलाचे रोपटे होते. त्यावरील बेलपत्र लक्ष्मीने तोडून शिवलिंगवर वाहिली. लक्ष्मीच्या भक्तिमधील सामर्थ्य पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले व तेव्हापासून शिवशंकराला बेलपत्र प्रिय आहे. भक्तावर तत्काळ प्रसन्न होणारा शिवशंकर खरोखरच महादेव आहे.