Publish Date: Thu, 11 Jan 2018 (11:26 IST)
Updated Date: Thu, 11 Jan 2018 (11:29 IST)
चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी नोटाबंदीसारखा महत्त्वाचा निर्णय घेतला. आता या निर्णयापाठोपाठ मोदी सरकार आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले असून नोटाबंदीनंतर नाणेबंदी करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भारतात नोएडा, मुंबई, कोलकाता आणि हैदराबाद या चार ठिकाणच्या टांकसाळमध्ये नाण्याचे उत्पादन केले जाते. मात्र या चारही टांकसाळमध्ये मंगळवारपासून नाण्यांचे उत्पादन करणे बंद करण्यात आले आहे. नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर नाणी चलनात आणण्यात आली होती. त्यामुळे आरबीआयच्या स्टोअरमध्ये नाण्यांचा भरमसाठ अतिरिक्त साठा झाला आहे. त्यामुळेच आरबीआयने पुढील आदेश मिळेपर्यंत नाणी पाडण्याचे काम बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
मोदी सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. सरकारने 500 आणि हजाराच्या नोटा बेकायदेशीर असल्याचे जाहीर केले होते. भ्रष्टाचार आणि काळा पैसा रोखण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारने सांगितले होते. या नोटा बंद केल्यानंतर सरकारनेनव्या 500 आणि दोन हजार रुपयांच्या नव नोटा बाजारात चलनात आणल्या होत्या. त्यानंतर आता नाणेबंदी केली जात असल्याचे मानले जात आहे.