Publish Date: Wed, 19 Dec 2018 (08:47 IST)
Updated Date: Wed, 19 Dec 2018 (08:49 IST)
‘महानगर टेलिफोन निगम’ला (एमटीएनएल) आर्थिकदृष्टय़ा कमकुवत करून ही कंपनी अंबानी यांच्या ‘जिओ’ला विकण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. ‘जिओ’ला कर्मचारी नको आहेत पण कोटय़वधींची ‘एमटीएनएल’ची मालमत्ता हवी आहे. केंद्र सरकारच्या या प्रयत्नांना मान्यताप्राप्त युनियनचे अध्यक्ष व खासदार अरविंद सावंत यांची साथ आहे, असा गंभीर आरोप ‘युनायटेड फोरम ऑफ युनियन्स आणि असोसिएशन्स’चे अध्यक्ष व आमदार भाई जगताप यांनी केला.
२२ हजार कोटींची मालमत्ता असलेली ‘विदेश संचार निगम’ही कंपनी फक्त १४३९ कोटी रुपयांना टाटा कंपनीला विकण्यात आली. त्याचीच पुनरावृत्ती ‘एमटीएनएल’बाबत होणार आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांचे वेतन लांबविण्यात आले. कर्मचाऱ्यांमध्ये भीती निर्माण करून त्यांना स्वेच्छानिवृत्ती घेण्यास भाग पाडले जाईल. कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणून कोटय़वधी रुपयांची मालमत्ता असलेली निगम ‘जिओ’ला विकण्याचा मार्ग मोकळा केला जाईल, असा आरोपही जगताप यांनी केला.