Publish Date: Tue, 17 Jul 2018 (08:58 IST)
Updated Date: Tue, 17 Jul 2018 (08:59 IST)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दरवाढीसाठी सुरू करण्यात आलेल्या दूधबंदी आंदोलनाचा परिणाम पहिल्या दिवशी मुंबई शहर व उपनगरात जाणवला नाही. दूध वितरक व डेअरीचालकांकडे पुरेसे दूध उपलब्ध असल्याने सुरळीतपणे विक्री सुरू होती. सध्या गरजेहून अधिक दूध उपलब्ध आहे, मात्र हे आंदोलन दोन-तीन दिवस सुरू राहिल्यास दूधटंचाई उद्भवू शकते, अशी शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात आली.
मुंबईला होणारा दूधपुरवठा बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर गोकुळ, वारणा याबरोबरच बहुतांश दूध उत्पादक कंपन्यांनी शनिवार, रविवारी अतिरिक्त दूध संकलन करून ठेवले आहे. त्याशिवाय गुजरातहून येणारे अमूलचे दूध रेल्वेतून पाठविण्यात आले. मुंबईकरांना गरज ७० लाख लीटरची असून पुरवठा
एक कोटी १२ लाख लीटर दुध उपलब्ध आहे. त्यामुळे जवळपास दुप्पट दुधाचा पुरवठा असल्याने मंगळवारीही विक्रीवर फारसा परिणाम जाणवणार नाही, असे जाणकारांकडून सांगण्यात आले.