Publish Date: Tue, 20 Oct 2020 (08:25 IST)
Updated Date: Tue, 20 Oct 2020 (08:26 IST)
देशात विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम कांद्याच्या दरावर होण्यास सुरुवात झाली आहे. जर कांद्याचे दर वाढत राहिले तर यावर्षी दिवाळीला कांद्याचे दर गगनाला भिडणार आहेत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
देशातील सर्वात मोठी कांद्याची मंडई असलेली महाराष्ट्राची लासलगावमध्ये सोमवारी कांद्याचा दर ६ हजार ८०२ रुपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतातील कांद्याचे पीक उद्धवस्त झाले आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. सध्या बाजारात कांद्याचे दर ६० रुपये प्रति किलो आहे.
दरम्यान कर्नाटकामध्ये देखील मुसळधार पावसामुळे कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे. याचा सर्व परिणाम कांद्याच्या दरावर झाला आहे.
लासलगावात सोमवारी कांद्याचे कमाल भाव ६ हजार ८०२ रुपये प्रति क्विंटल, सरासरी भाव ६ हजार २०० रुपये आणि खराब कांद्याचा भाव १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल होता. माहितीनुसार, लासलगाच्या मोठ्या व्यापाऱ्यांवर १४ ऑक्टोबरला आयकर विभागाची धाड पडली. यानंतर भीतीमुळे व्यापारी मंडईत येत नव्हते. पण सोमवारी व्यापारी मंडईत पोहोचले आणि कांद्याचे दर वाढले.