जिल्ह्यातून स्टेट बँकेच्या शाखेत जमा करण्यात आलेल्या जीर्ण नोटा बँकेने आरबीआयकडे पाठवल्या असता त्याबदल्यात आरबीआयकडून जीर्ण नोटांचा पुरवठा करण्यात आला आहे. यात 100, 50, 20, 10 आणि 5 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे. आबीआयकडून नवीन चलन उपलब्ध न झाल्याने एसबीआयचे एटीएमही बंद पडू लागल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील नागरिकांना नोटांअभावी चलनकोंडीचा सामना करावा लागत आहे. आजमितीस स्टेट बँकेकडे ग्रामीण भागासाठी 223 कोटी रुपये शिल्लक आहेत. बँकेने आरबीआयकडे 250 कोटींची मागणी केली आहे. मात्र चार दिवस उलटूनही अद्याप रिझर्व्ह बँकेकडून चलन उपलब्ध झालेले नाही. राज्यभरातील आर्थिक आणीबाणी सोडवण्यासाठी स्टेट बँकेने विविध जिल्ह्यांतील चेस्ट शाखांसाठी 2 हजार 500 कोटींची मागणी रिझर्व्ह बँकेकडे केली होती.
यात नाशिक जिल्ह्याचा 250 कोटींचा समावेश होता. मात्र रिझर्व्ह बँकेने नाशिक जिल्ह्यासाठी 200 कोटी देण्याचे मान्य करत शुक्रवारी चलन घेण्यासाठी बोलवले होते. मात्र अद्याप स्टेट बँकेच्या हाती एकही रुपया मिळाला नाही. दरम्यान, बँकेत जमा झालेल्या 100, 50, 20, 10 आणि 5 रुपयांच्या जीर्ण नोटा बँकेने बदलून घेण्यासाठी पाठवल्या असता आरबीआयकडून स्टेट बँकेच्या नाशिक शाखेला पुन्हा त्याच जीर्ण नोटांचा चलनपुरवठा करण्यात आला. जिल्ह्यातील स्टेट बँक वगळता इतर बँकांमध्ये शुक्रवारीच खडखडाट झाला आहे. या बँकांना 350 कोटींचे चलन मिळावे, अशी मागणी रिझर्व्ह बँकेला केली आहे. मात्र अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
एटीएम बंद : नाशिकसह उपनगरातील 80 टक्क्यांहून अधिक एटीएम बंद असल्याने नोटांसाठी नाशिककरांना एटीएमची शोधाशोध करावी लागत आहे. शहरात एसबीआयचे बहुतांश एटीएम सुरू होते, मात्र एसबीआयला रिझर्व्ह बँकेकडून चलनपुरवठा न झाल्याने आता एसबीआयच्या एटीएमबाहेर नोटा शिल्लक नाही असा फलक पाहायला मिळत आहे.