Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गो फर्स्ट विमान कंपनी अडचणीत का आली? त्यांचं नेमकं चुकलं कुठे?

गो फर्स्ट विमान कंपनी अडचणीत का आली? त्यांचं नेमकं चुकलं कुठे?
, रविवार, 7 मे 2023 (17:01 IST)
भारतात उन्हाळी सुट्ट्यांमुळे विमानतळांवरील गर्दी वाढली असली तरी एका विमान कंपनीचं काऊंटर मात्र रिकामं असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. गो फर्स्ट या विमान कंपनीने या आठवड्याच्या सुरुवातीला अचानक दिवाळखोरीसाठी अर्ज केला आणि काही दिवसांसाठी उड्डाणे रद्द केली आहेत. परिणामी, संतप्त प्रवाशांचे कित्येक कॉल कंपनीच्या ग्राहक सेवा प्रतिनिधींना येत आहे.
 
विमान कंपनीने एअरलाइनने ग्राहकांना परतावा देण्याचे आश्वासन दिलं आहे, तरीही या कॉल्सची संख्या मात्र कमी होताना दिसत नाही.
 
एका बातमीनुसार, गो फर्स्टला 20 विमाने भाड्याने देणाऱ्या गुंतवणूकदारांनी भारताच्या विमान वाहतूक नियामकांकडे त्यांची नोंदणी रद्द करण्याची मागणी केली आहे.
 
ही सगळी दृश्ये पाहिली तर 2019 च्या आठवणींना उजाळा मिळतो. त्यावेळी भारतातील सर्वात मोठी असलेली जेट एअरवेज कंपनी बंद पडली.
 
यानंतर चार वर्षांतच गो फर्स्ट विमान कंपनीचा या यादीत समावेश झाला आहे.
 
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने गुरुवारी (4 मे) गो फर्स्टच्या दिवाळखोरीच्या याचिकेवर सुनावणी केली. विमान वाहतूक नियामकांनी कोणत्याही प्रकारची निर्बंधांची कारवाई करू नये, असं त्यांचं म्हणणं आहे.
 
गो फर्स्टच्या म्हणण्यानुसार, “कंपनी अडचणीत सापडण्याचं कारण आर्थिक गैरव्यवस्थापन नसून इंजीनमधील समस्यांमुळे ही समस्या निर्माण झाली आहे."
 
कंपनीने आपल्या दिवाळखोरीच्या अर्जात असंही म्हटलं आहे की, त्यांनी कर्जाची परतफेड करताना आजवर एकही हप्ता चुकवलेला नाही.
 
गो फर्स्टने आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीचं खापर अमेरिकेतील प्रॅट अँड व्हीटनी या इंजिन निर्मात्या कंपनीवर फोडलं.
 
त्यांनी पुरवलेल्या सदोष इंजिनांमुळे अनेक विमाने यार्डातच ठेवावी लागली. त्यामुळे प्रवाशांकडून रोख रक्कम जमा होण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले, असं कंपनीने सांगितलं.
 
कंपनीच्या ताफ्यात असलेल्या विमानांपैकी जवळपास निम्मी म्हणजेच 25 विमाने वापर न करता जमिनीवरच थांबवून ठेवावी लागली, असं त्यांनी सांगितलं.
 
या कारणामुळे गो फर्स्टला तब्बल 1.3 अब्ज डॉलरचं नुकसान सहन करावं लागलं.
 
सिरीयम या एव्हिएशन अॅनालिटिक्स फर्मच्या मते, “गो फर्स्ट मे महिन्यात 6 हजार 225 विमाने चालवणार होती. या विमानांमधून सुमारे जवळपास 11 लाख तिकिटांची विक्री होऊ शकली असती.”
 
गो फर्स्टने आपल्या स्थितीसाठी प्रॅट अँड व्हिटनी कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
 
प्रॅट अँड व्हीटनीने आपत्कालीन लवादाने दिलेल्या आदेशाचे पालन केलं नाही. त्यामध्ये 27 एप्रिल 2023 पर्यंत किमान 10 सेवायोग्य स्पेअर भाडेतत्त्वावरील इंजिनांचा पुरवठा करणे," याचा समावेश होता.
 
या आरोपांबाबत बोलताना प्रॅट अँड व्हिटनी कंपनीने म्हटलं की मार्च 2023 मध्ये लवादाने दिलेल्या आदेशाचं पालन कंपनी करत आहे. पण ही बाब आता न्यायप्रविष्ट असल्याने याबाबत अधिक भाष्य करू शकत नाही.
 
गो फर्स्टच्या विमानांच्या ताफ्यातील सुमारे 90% वाटा हा प्रॅट आणि व्हिटनी इंजिनच्या वापराने बनवलेल्या A320neos चा आहे, हे विशेष.
 
2020 पासून या विमानांना आवश्यक असणरी उपकरणे किंवा स्पेअर पार्ट्स अदींची अनुपलब्धता यांमुळे विमाने ग्राऊंड करण्यात आली. निम्मी विमाने थांबून असल्यामुळे कंपनीच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला. अखेर, वेळापत्रकातील अनेक उड्डाणे रद्द करावी लागली.
 
गो फर्स्ट ही उड्डाणांच्या बाबतीत आधारित भारतातील पाचवी सर्वात मोठी विमान कंपनी होती.
 
एअरलाइन्सचे मालक वाडिया ग्रुपने संकटातून बाहेर पडण्यासाठी कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे ही परिस्थिती आली, असं कंपनी व्यवस्थापनाने म्हटलं आहे.
 
दिवाळखोरीची कार्यवाही करण्याचं उद्दीष्ट म्हणजे कंपनीला पुनर्जिवित करणे आहे, ती विकायचा कोणताही उद्देश नाही, असं गो फर्स्टचे CEO कौशिक खोना यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.
 
भारतात हवाई वाहतूक क्षेत्र वेगाने वाढत आहे. पण काही कंपन्यांवर वाढती स्पर्धा, कर्ज आणि वाढता खर्च अशी आव्हाने आली.
 
या दरम्यान, अनेक विमान कंपन्यांची विमाने ग्राऊंड करावी लागली. किंवा त्यांचं एकत्रीकरण तरी करावं लागलं.
 
उदा. जेट एअरवेज, किंगफिशर, एअर डेक्कन, पॅरामाऊंट एअरवेज इ.
 
जेट एअरवेजला तर प्रदीर्घ अशा दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरे जावं लागलं. नंतर मंजुरी मिळाल्यानंतरही ते आतापर्यंत सेवा पुन्हा सुरू करू शकले नाहीत.
 
मार्टिन कन्सल्टिंगचे संस्थापक आणि CEO मार्क मार्टिन म्हणतात, “घटक पुरवठ्याच्या समस्येपुढे भारतातील एखादी विमान कंपनी कोसळण्याची ही पहिलीच वेळ आहे.”
 
गो फर्स्टच्या मते, ही 2020 पर्यंत हळूहळू विस्ताराचं नियोजन केलेली एक सातत्याने फायद्यात असलेली कंपनी होती. या कंपनीला सातत्याने इंजीनमध्ये बिघाड होण्याच्या समस्येचा फटका बसला. असं त्यांनी दिवाळखोरीसाठी अर्ज दाखल करताना म्हटलं.
 
दरम्यान, गो फर्स्टने भाडेतत्त्वावर घेतलेली विमाने त्यांचा परताव्याची देयके न भरल्याने त्यांच्या मालकांनी पुहा ताब्यात घेतली आहेत.
 
तेल विपणन कंपन्यांनी तात्काळ पेमेंट मॉडेलची मागणी त्यांच्याकडे केली होती. पण महसूलच मुळात कमी झालेला असल्याने दैनंदिन देणी देणं कंपनीसाठी कठीण बनलं.
कंपनीला वाडिया समुहाने गो फर्स्टमध्ये गेल्या तीन वर्षांत सुमारे 32 अब्ज रुपये गुंतवलेले असूनही पुढच्या काळात त्यांचं काम ठप्प झालं.
 
गो फर्स्टचे पतन हे देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रातील स्पर्धा दर्शवतं. कोरोना साथीनंतर हवाई वाहतूक पुन्हा सुरळीत होण्यास सुरुवात झाली होती.
 
2023 च्या पहिल्या तीन महिन्यांत 37.5 दशलक्ष प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 51.7 टक्के जास्त आहे.
 
CAPA सेंटर फॉर एव्हिएशननुसार, 2030 पर्यंत भारतातील देशांतर्गत हवाई वाहतूक 350 दशलक्ष प्रवाशांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
 
गो फर्स्टवरील संकटानंतर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या इंडिगो, एअर इंडिया, स्पाईसजेटसारख्या कंपन्यांना याचा फायदा होऊ शकतो.
 
तसंच आकासा एअरसारख्या नव्या कंपन्यांना आपलं बस्तान मांडण्यासाठी याचा उपयोग करून घेता येईल.
 
पण, या घडामोडींचा फायदा ग्राहकांना होईल की नाही याबाबत शंकाच आहे.
 
कारण, गो फर्स्टच्या विमान मार्गांवर पुढील तीन-चार महिने प्रवास भाडे हे वाढवण्यात येऊ शकत, असं मार्टिन सांगतात.
 
ते पुढे म्हणतात, “गो फर्स्ट बंद झाल्यास 50 हून अधिक विमाने ग्राउंड होतील. इतर एअरलाइन्स देखील बंद आहेत. मागणी जास्त असली तरी ती पूर्ण करण्याची क्षमता सध्याच्या विमान कंपन्यांकडे नाही.
 
अशा स्थितीत विमान वाहतूक क्षेत्राला इंजीन आणि पुरवठासंदर्भात समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.
 
देशात सर्वात मोठा वाटा असलेल्या इंडिगो कंपनीलाही प्रॅट आणि व्हिटनीच्या इंजिनातील बिघाडामुळे फटका बसला होता.
 
स्पेअर पार्ट्सअभावी त्यांची 60 विमाने ग्राउंड करण्यात आली, मात्र, त्यांच्याकडे 250 पेक्षा जास्त विमानांचा ताफा आहे, ज्यापैकी अनेक इतर इंजिनांवर चालतात. त्यामुळे त्यांना त्यातून मार्ग काढता आला.
 
दुसरीकडे, स्पाईसजेट कंपनीही आर्थिक संकटाशी झुंज देत आहे.
 
दुसरीकडे, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्वात मोठ्या कंपन्यांनी म्हणजेच एअर इंडिया आणि विस्तारा यांनी विलिनीकरणाची घोषणा केली होती.
 
यानंतर फेब्रुवारी महिन्यात एअर इंडियाने युरोपातील एअरबस आणि अमेरिकास्थित बोईंगकडून 470 विमानांची ऑर्डर देऊन जागतिक विक्रमही केलेला आहे.
 
या गोष्टी विचारात घेतल्यास भारतीय हवाई वाहतूक क्षेत्रात पुढील दोन-तीन वर्षांत वाढ पाहायला मिळू शकते. दोन-तीन कंपन्या यातून नफा कमवू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.
 
Published By- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

GT vs LSG : आज पंड्या विरुद्ध पंड्या, 'या' आहेत IPL मधील भावांच्या जोड्या