मान्सूनचा फटका बसण्यास आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. साखर, अमूल दूध महाग झाल्यानंतर आता उत्पादन घसरल्याने चहाही महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सरकारनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी टाटा टीच्या अधिकाऱ्यांनी चहा महागणार नसल्याचे म्हटले होते. या अधिकाऱ्यांना कदाचित मान्सूनचा अंदाज आला नाही. आता कंपनीनेच चहा महागण्याची शक्यता वर्तवली असून, मान्सूनमुळे उत्पादन कमी झाले आणि या परिणामी आता चहा महागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
देशात ब्राझीलवरून साखर आयात करण्यात आली असली तरी तुटवडा अद्यापही कायम असल्याने आणि सण-उत्सव सुरू असल्याने साखरेची मागणी वाढणार आहे.
वाढती मागणी आणि तुटवडा यांचे गणित सोडवण्यात सरकार अपयशी ठरले असून, आगामी वर्षात साखर 40 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजधानी दिल्लीसह देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये दूध दर वाढले आहेत. डाळ महाग, साखर तांदूळ, आणि आता चहाही महागणार असल्याची शक्यता असल्याने सामान्यांचे दिवाळीत दिवाळे निघणार हे निश्चित.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा