Publish Date: Thu, 01 Oct 2009 (16:59 IST)
Updated Date: Thu, 01 Oct 2009 (16:59 IST)
खुशखबर... हुश्श अखेर जगाला संकटात टाकणारी आर्थिक मंदी अखेर संपली आहे. मंदीतील अर्थव्यवस्था रूळावर यायला मात्र अजूनही यंदाचे वर्ष लागेलच, असा भविष्याचा आशावादी वेध घेणारा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जाहीर केला आहे. जगाला मंदीतून बाहेर काढण्यात भारत आणि चीन महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
अर्थात, ही मंदी कमी व्हायलाही सरकारांनी सामान्यांसाठी मोकळा सोडलेला हात बव्हंशी कारणीभूत आहे. ज्या अर्थव्यवस्थांनी असे केले नाही, त्या अजूनही कमजोर रहाण्याचीच शक्यता आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढतच राहिल आणि मंदी दूर होण्याचा वेगही कमीच राहिल, असा इशाराही नाणेनिधीने दिला आहे.
एकुणात जागतिक अर्थव्यवस्था या वर्षी १.१ टक्क्यांनी संकोच पावेल. पण पुढील वर्षी त्यात ३.१ टक्क्याने वाढ होण्याची अपेक्षा आहे. नाणेनिधीच्या जुलैच्या अंदाजात हेच आकडे अनुक्रमे १.४ टक्के आणि २.५ टक्के असे होते. त्यामुळे मंदीच्या बाबतीत आशेला वाव आहे.
मंदी संपली तरी लगेचच काही अर्थव्यवस्था उभारी घेणार नाही. त्यामुळे विकासही रांगत रांगतच होईल. २०१० ते २०१४ या काळात मात्र जागतिक अर्थव्यवस्था चार टक्क्याने वाढेल. आणि अर्थव्यवस्थेतील ही वाढही भारत आणि चीन या आशियाई अर्थव्यवस्थांच्या जोरावरच होईल, असेही नाणेनिधीने या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे. या काळातच अमेरिका, युरोप आणि जपान हे देश जबर मंदीतून कण्हत कुथत बाहेर पडू लागतील असेही अहवालात म्हटले आहे.