Publish Date: Thu, 06 Feb 2020 (16:32 IST)
Updated Date: Thu, 06 Feb 2020 (16:34 IST)
स्वराज्यरक्षक संभाजी ही ऐतिहासिक विषयावरील मालिका सुरू आहे. मात्र, सोशल मीडियावर शरद पवार आणि अमोल कोल्हे यांचे मीम्स व्हायरल झाले होते. तसेच राजकीय दबावामुळे ही मालिका बंद होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याबाबत कोल्हे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून खुलासा केला आहे की, ही मालिका कथा पूर्ण होईपर्यंत सुरू राहणार आहे. स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेबाबत अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत. चुकीची माहिती समोर येत आहे. या पोस्ट्स सोशल मीडियावर टाकणाऱ्यांनी आणि व्हायरल करणाऱ्यांनी संपूर्ण मालिका पाहावी.
मालिका बंद होण्याबाबत कोल्हे यांनी ट्विटरवर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करून ही अफवा असल्याचे म्हटले आहे. कोल्हे यांनी म्हटलंय की, ''गेले काही दिवस स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात अफवा पसरत आहेत. कोणतीही शहानिशा न करता अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे सोशल मीडियावर अफवा पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. प्रेक्षक म्हणून आपण संपूर्ण मालिका पाहिल्यानंतर टिप्पणी करा. आपणास मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मालिका अजून पूर्ण झालेली नाही. अशा परिस्थितीत अपप्रचार करणे योग्य नाही.’