मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरा बसला असला तरी भारतातील क्रिकेटवर त्याचा काहीही परिणाम होणार नसल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने व्यक्त केले आहे.
या हल्ल्यामुळे इंग्लंडचा संघ एकदिवसीय मालिका अर्धवट सोडून मायदेशी परतला आहे. चॅम्पियन्स ट्वेंन्टी-20 स्पर्धा होणार की नाही, हे अजून निश्चित नाही. परंतु, हळूहळू परिस्थितीत सुधारणा होऊन भारतात पुन्हा क्रिकेटचे वारे वाहू लागेल असे वॉने आपल्या स्तंभ लेखात म्हटले आहे.
क्रिकेट हा खेळ भारताचे प्रेरणास्थान आहे, आत्मविश्वास पुन्हा मिळवून देण्याची त्यामध्ये क्षमता आहे. मुंबईवर झालेल्या या हल्ल्यामुळे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाईल, त्यामुळे तेथे जाण्याची भीती राहणार नाही.