Publish Date: Thu, 20 Sep 2018 (10:46 IST)
Updated Date: Thu, 20 Sep 2018 (10:52 IST)
आशिया कपच्या मॅचमध्ये भारतानं पाकिस्तानवर 8 विकेटनी दणदणीत विजय मिळवला आहे. पाकिस्ताननं ठेवलेल्या 163 रनचा पाठलाग भारतानं 2 विकेट गमावून 29 ओव्हरमध्ये केला. कर्णधार रोहित शर्मानं सर्वाधिक 52 रन केले. तर हाँगकाँगविरुद्ध शतक करणाऱ्या शिखर धवनला 46 रन करता आल्या. अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक प्रत्येकी 31 रनवर नाबाद राहिले. पाकिस्तानच्या शादाब खाननं एक तर फईम अश्रफनं एक विकेट घेतली.
हाँगकाँगला हरवल्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या टीम याआधीच आशिया कपच्या सुपर-4मध्ये पोहोचल्या होत्या. आता सुपर-4मध्ये 23 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचा पुन्हा सामना होणार आहे. भारत, पाकिस्तान या ग्रुप एमधून तर बांगलादेश आणि अफगाणिस्तान ग्रुप बीमधून सुपर-4मध्ये पोहोचल्या आहेत. भारत आणि पाकिस्तान फायनलमध्ये गेले तर त्यांची पुन्हा एकदा 28 सप्टेंबरला फायनल होईल.
त्याआधी टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या पाकिस्तानच्या बॅट्समननी भारतीय बॉलरपुढे लोटांगण घातलं. पाकिस्तानची टीम 162 रनवर ऑल आऊट झाली. पाकिस्तानच्या पहिल्या 2 विकेट 3 रनवरच गेल्या. यानंतर बाबर आझम आणि शोएब मलिकनं पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय बॉलरनी पाकिस्तानला वारंवार धक्के दिले. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधवनं प्रत्येती 3-3 विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहला 2 विकेट घेण्यात यश आलं. स्पिनर कुलदीप यादवनं 1 विकेट घेतली. पाकिस्तानच्या बाबर आझमनं सर्वाधिक 47 रन केले. तर शोएब मलिक 43 रन करून रन आऊट झाला.