Publish Date: Sun, 26 Jun 2022 (17:33 IST)
Updated Date: Sun, 26 Jun 2022 (17:38 IST)
मध्य प्रदेश संघाने अंतिम सामन्यात मुंबईचा पराभव करून रणजी ट्रॉफी 2021-22 चे विजेतेपद पटकावले. मध्य प्रदेश संघाने प्रथमच ही स्पर्धा जिंकली आहे. एम चिन्नास्वामी, बेंगळुरू येथे झालेल्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशने मुंबईचा सहा गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 374 धावा केल्या. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने 536 धावांची मोठी मजल मारली. दुसऱ्या डावात मुंबईच्या संघाने 269 धावा केल्या. सामन्याच्या चौथ्या डावात मध्य प्रदेशसमोर 108 धावांचे लक्ष्य होते. मध्य प्रदेशने सहा गडी गमावून हे लक्ष्य गाठले. यासह रणजी करंडक जिंकणारा मध्य प्रदेश 20 वा संघ ठरला.
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिलाष खांडेकर म्हणाले की, संघाच्या ऐतिहासिक विजयाबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. मध्य प्रदेशसाठी हे अभूतपूर्व यश आहे. हा विजय संपूर्ण राज्यातील जनतेला समर्पित आहे. चंद्रकांत पंडित आणि टीमच्या सर्व सदस्यांनी उत्तम काम केले आहे. एमपीसीएतर्फे संपूर्ण टीमला 2 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली जाईल.