Publish Date: Mon, 17 Sep 2018 (15:29 IST)
Updated Date: Mon, 17 Sep 2018 (15:30 IST)
भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली याला आशिया चषक स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. हा निर्णय हा बीसीसीआयच्या निवड समितीचा आहे. कोणत्या खेळाडूला संघात स्थान द्यायचे आणि कोणत्या खेळाडूला विश्रांती द्यायची, हा सर्वस्वी निवड समितीचा निणर्य असतो. त्यात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेला स्पष्ट केले.
या स्पर्धेसाठी विराटला वगळण्यात आल्याबाबत स्टार वाहिनीने आशियाई क्रिकेट परिषदेला नाराजी पत्र पाठवले आहे. २९ जून २०१७ मध्ये आशिया चषक स्पर्धेच्या प्रक्षेपणाचा करार झाला. त्यावेळी सहभागी प्रत्येक संघ स्पर्धेसाठी सर्वोत्तम खेळाडूंची निवड करतील, असे आश्वासन देण्यात आले होते. विराट कोहली हा सध्या आघाडीचा आणि यशस्वी फलंदाज आहे. त्यामुळे त्याला अशा स्पर्धांमधून वगळल्याने आमच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो, अशा आशयाचे पत्र ‘स्टार’कडून आशियाई क्रिकेट परिषदेला पाठवण्यात आले होते.