ऍडॉल्फ हिटलर याच्यावर कौतूक सुमने उधळल्याने शिवसेनाप्रमुख पुन्हा अडचणीत आले. २९ जानेवारी २००७ रोजी इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हिटलरचे कौतुक केले. हिटलरचे कार्य वाईट होते मात्र तो कलेचा पुजारी होता. देशाचे नेतृत्त्व करण्याची क्षमता त्याच्यात होती. माझ्यातही हिटलरप्रमाणेच काही चांगले आणि वाईट गुण आहे असे शिवसेनाप्रमुखांनी या मुलाखतीत म्हटले होते. बाळासाहेब आणि वाद हे सतत सोबतच चालत आले आहे. बाबरी मशीद पाडणारे शिवसैनिक असतील तर त्यांचा प्रचंड अभिमान आहे. असे सांगणारा दुसरा कोणताच हिंदुत्त्ववादी नेता नसावा. भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृती होत असणारे आक्रमणही त्यांना सहन होत नाही म्हणूनच व्हॅलेंटाईन डे ला त्यांचा प्रखर विरोध असतो. अशा एक ना अनेक मुद्यांवरून ते नेहमीच चर्चेत राहतात. या विचारांमुळेच शिवसेना वाढत गेली. शिवसेनाप्रमुखांसाठी जीव वाढून टाकणार्यांची संख्याही वाढत गेली.शिवसेनेच्या वतीने दरवर्षी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेतला जातो. शिवसेना प्रमुखांचे तेजस्वी विचार ऐकण्यासाठी येथे लाखोच्या संख्येने गर्दी होते. एक नेता, एक व्यासपीठ आणि एक पक्ष अशा स्वरूपाचा हा मेळावा चार दशकांपासून सुरू आहे. याबद्दल शिवसेनाप्रमुखांचे नाव गिनिज बुकातही नोंदवले गेले. कितीही अडचणी आल्या तरी या मेळाव्यात खंड पडला नाही. फक्त एकदाच पावसामुळे मुंबई जलमय झाली त्यावेळी हा मेळावा होऊ शकला नाही. अलीकडे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यावरील टीकेमुळे बाळासाहेब चर्चेत आले. संसदेवरील हल्ल्यातील मुख्य आरोपी अफजल गुरू याला न्यायालयाने फाशी सुनावली आहे मात्र त्याने दयेचा अर्ज डॉ. कलाम यांच्याकडे सादर केला होता त्यावर कोणताच निर्णय न झाल्याने बाळासाहेब भडकले. शिवसेनेने आणि बाळासाहेबांनी अनेक धक्के पचवले. अगदी अलीकडच्या बाबतीत बोलायचे झाले तर माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेला उत्तर भारतीयांचा पाठिंबा मिळवून देणारे संजय निरूपम पक्षातून बाहेर पडले. दोघांनी काँग्रेसचा हात धरला. या धक्क्यातून सावरत नाहीत तोच १८ डिसेंबर ०५ रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. याप्रसंगी बाळासाहेब काहीसे भावूक झाले. या चिमण्यांनो परत फिरा अशी आर्त हाक देऊन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.बाळासाहेबांचे सुपूत्र उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने शिवसेनेवर घराणेशाहीचा आरोप झाला. यावरही बाळासाहेब यांना प्रचंड मनःस्ताप सहन करावा लागला. महाबळेश्वर येथे झालेल्या एका बैठकीत उद्धव ठाकरे यांना हे पद बहाल करण्यात आले. वास्तविक पाहता शिवसेनाप्रमुख या बैठकीलाही हजर नव्हते. मात्र नंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या नेतृत्त्वाची चमक दाखवली आणि बोलणार्यांची तोंडे गप्प केली. अशा अनेक प्रसंगातून पुढे जात शिवसेना बळकट झाली. बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासही बळकट होत गेला. ई टिव्हीने घेतलेल्या सर्वेक्षणात महानेता म्हणून बाळासाहेबांचीच निवड झाली. त्यांची लोकप्रियता आजमावण्यासाठी एवढा दाखला पुरेसा आहे.
आता ठाकरे घराण्याची पुढची पिढी आता समोर येत आहे. बाळासाहेब या पिढीबद्दल प्रचंड आशावादी आहेत. गेल्या आठवडात उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा हिंदी गीतांचा एक अल्बम बाजारात आला. त्याचे प्रकाशन करतांना पुढे जा, मोठा हो, तुझ्याकडे उभे आयुष्य बाकी आहे. अशा शब्दांत बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले. सदैव दुसर्यांना मोठा करणारा हा दृष्टा नेता आहे. ८२ व्या वाढदिवसांनिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा..!