Publish Date: Wed, 08 Jan 2020 (10:56 IST)
Updated Date: Wed, 08 Jan 2020 (11:12 IST)
आयुष्यात कलेला खूप महत्त्व आहे. कला म्हणजे काय? तर एखाद्या गोष्टीतील सौंदर्याचा शोध आणि हीच कला आयुष्यात आपल्याला चांगले जगाला शिकवते. चांगली दृष्टी मिळवून देते. ज्या ज्या गोष्टींमध्ये सौंर्दय सामावलेले असते, ती ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मनापासून आवडते. कारण निसर्गतःच सौंर्दय हा मानवी जीवनाचा स्थायी भाव आहे. निखळ आनंद मिळवुन देणे, हे कलेचे उद्दिष्ट आहे. 'जी दिसते सोपी पण असते कठीण तीच कला'. अशी कोणतीही कला साध्य करायची असेल तर त्याला प्रामाणिक प्रयत्नांची, मनःपूर्वक केलेल्या ज्ञान साधनेची नितांत गरज असते. चित्र, वक्तृत्व, अभिनय, गायन इत्यादी कलेप्रमाणे सुंदर हस्ताक्षर असणे हीसुद्धा एक महत्त्वाची कला आहे. मानवाचे अंतर्मन दाखविणारा हा आरसा आहे.
आपल्या स्वतःच्या आणि दुसर्याच्या मनावर प्रभाव पडणारे हे एक आमूलाग्र तंत्र आहे. सुवाच्य हस्ताक्षर आपल्याजवळ टिकणारे एक भूषण आहे. दुसर्याच्या मनात प्रेम व आदरभाव निर्माण करणारी ही सचोटी आहे. आपले हस्ताक्षर कसे असावे याविषयी समर्थ रामदासांनी खूप सोप्या भाषेत दासबोधातून मार्गदर्शन केले आहे. आपले मन, आपले आचरण चांगले हवे म्हणून पाहा आपल्या मनात आलेला सुंदर विचार जर योग्यवेळी सुंदर अक्षरात लिहून ठेवला तर तो सुविचार म्हणून अजरामर होईल.