Publish Date: Fri, 15 Jan 2021 (16:49 IST)
Updated Date: Fri, 15 Jan 2021 (16:52 IST)
आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवाफुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही?
जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळभ रहात नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची?
अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वत:चा कमीपणा वाटू शकतो या भयाने आपण ती वात पेटती ठेवतो पण हे बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी चढला.