Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सकारात्मकतेची कलात्मकता

सकारात्मकतेची कलात्मकता

अमेय पद्माकर कस्तुरे

, मंगळवार, 11 मे 2021 (12:15 IST)
हे शीर्षक देण्याचं कारण म्हणजे कलात्मकतेने जीवनननंद घेतला तर सकारात्मकता आपोआपच येत जाते. थोडे वेगळे वाटते ना ऐकावयास ? चला तर मग हा लेख वाचूनच समजून घेऊयात की मला नक्की काय म्हणायचे आहे ते !!!!!
 
माझ्या मताप्रमाणे देवाने आपल्याला ११ सवंगडी हे जन्मताच दिले आहेत. आता ११ सवंगडी म्हणजे नक्की कोणते? तर २ डोळे (ज्यांना आपण जे दाखवू ते सर्व ते पाहतात), २ कान (ज्यांना आपण जे-जे ऐकवतो ते ते ऐकतात), २ पाय (ज्यांना आपण जिथे इच्छितो तेथे ते आपल्याला घेऊन जातात), २ हात (ज्यांच्याकडून आपण हवे ते काम करवू शकतो), १ नाक (जे आपल्याला गंधाचे ज्ञान देतात) व १ तोंड (जे आवरताना आपल्याला जन्म देखील अपुराच पडतो). हे झाले आपले १० सवंगडी, मग तुम्ही विचार कराल की ११ वा सवंगडी म्हणजे नक्की कोणता ? हा ११ वा सवंगडी म्हणजे ह्या १० सवंगड्यां पेक्षा खूप जास्त क्षमता असणारा, जो वेळप्रसंगी नायक आणि खलनायक या दोन्ही भूमिका लीलया पेलणारा असा सवंगडी आहे.
 
आपण विचारात पडला असाल, की नक्की असा कोण आहे जो सवंगडी असूनही कधी नायक तर कधी खलनायक बनतो ? तो ११वा सवंगडी म्हणजे इतर कोणी नसून आपलं " मन " आहे. जे जन्मा पासूनच १० सवंगड्यां सारखे आपल्या सोबतच असते.
 
मनामध्ये इतकी शक्ती आहे की खलनायकाच्या रुपात, जिवंत माणसाला ते मरण यातना देऊ शकते व नायकाच्या रूपात मरणाच्या दारात अडकलेल्या माणसास उभारी देऊन परत सर्वसाधारण मनुष्य करू शकते. पटलं ना ? पटल्यास मनातल्या मनात (११वा सवंगडी सोबत) का असेना पण हो नक्की म्हणा, म्हणजे मी समजेन की मला जे सांगायचे आहे ते आपणास जरूर पटले. चला तर या लेखात मी ११व्या सवंगड्याचा एक पैलू (जो सर्वस्वी माझा दृष्टीकोन आहे) त्याबद्दल काही लिहीत आहे.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पुन्हा एकदा लोक डाऊन मध्ये आलो आहोत. बातम्या, प्रसारमाध्यम, सोशल मीडिया ह्यात दाखवली जाणारी माहिती, यामुळे आपला ११वा सवंगडी हा नायक असतानाही बऱ्याचदा खलनायकाचे रूप धारण करतो. मग बऱ्याचदा आपल्याला आपसूकच वाटू लागते की मला श्वास घ्यायला त्रास होतोय, छातीत धडधडते आहे, डोकं दुखतंय !!!!! ह्याचा अर्थ काय ? तर जे आपण डोळ्यांना वाचायला, कानांना ऐकायला लावतो, ते कुठे ना कुठे आपल्या मनरुपी सवंगड्याला माहिती देतात आणि एरवी नायक असणारे आपलं मन अचानक खलनायक बनतं आणि जसे मी आधीही म्हणालो की या ११व्या सवंगड्यात एवढी शक्ती आहे की मानसिकते मुळे सुद्धा निरोगी माणूस रोगी होत जातो.
 
आता यावर उपाय काय ? किती गहन आहे ना हा प्रश्न !!!!! मी हाच प्रश्न लेख लिहायच्या आधी माझ्या मनाला विचारला, आणी मनाने जे मला सांगितले त्यातल्या काही बाजू मी येथे नमूद करत आहे. आजकाल बहुतांश लोकांना वर्क फ्रॉम होम हा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे परिवार (मग त्यात कितीही सदस्य असू देत) हे दिवसभर एकाच छताखाली असतात. आता एकाच छताखाली राहणं म्हणजे एकत्र राहणं का ? तर नक्कीच नाही. एकमेकां पासून वेगवेगळ्या स्थानावर असलेली व्यक्ती देखील आपल्याला एकत्र असण्याचा आनंद देते व एकाच छताखाली राहून सुद्धा आपण "एकत्र" आहोत असा "फिल" काहीदा येत नाही.
 
गेल्या वर्षभरापासून सततच्या सोशल मीडियावरील वाचनामुळे जवळपास आजकाल प्रत्येक घरात एक किंवा दोन डॉक्टर आढळतात. जे फक्त गेल्या एक वर्षाच्या सोशल मीडियावरील अभ्यासामुळे डॉक्टर झाले असावेत. वातावरणातील बदलांमुळे अगदी साधी " शिंक " आली तरी तथाकथित डॉक्टरांना " शंका " यायला सुरुवात होते. आपल्या मराठी भाषेत एका वेलांटी ने शब्दाच्या अर्थात किती फरक पडतो हे आपल्याला सहज कळू शकते. सध्याचा काळ हा जास्त काळजी न करता एकमेकांना धीर देण्याचा काळ आहे. घरातील वयोवृद्धांशी, वरीष्टांशी संवाद साधणं हे फार जास्त गरजेच आहे. संवाद किंवा परिसंवादाने घरातील सर्वांनाच एक मानसिक उभारी मिळते,  फक्त एक काळजी आवर्जून घ्यावी, ती म्हणजे कुठलीही चर्चा ही कोरोना संदर्भात किंवा कोरानाने दगावलेल्या माणसांच्या संदर्भात नसावी. या परिसंवादात मुळे घरांमध्ये एकमेकांशी तथाकथित " चॅट " न होता "संवाद" होतो. " काळजी करू नका मी आहे तुमच्यासोबत "  हे एक वाक्य ढासळलेल्या मनाला देखील उभारी देतं.  सध्य परिस्थिती ही घरातील सदस्यांना मनोबल देण्याची जास्त गरज आहे. मनातून भीती दूर ठेवण्यासाठी हा संवाद हे एक उत्तम औषध आहे. कधी कधी वाटते थ्री इडियट्स मधील आमिर खानने स्वतःच्या छातीवर हात ठेवून " आल इज वेल " असे वाक्य आपणास  म्हणण्याची देखील गरज आहे.
 
काहीदा आपल्या ११ सवंगड्यांना मूर्ख बनवण्याची कला देखील आपल्याला अवगत असायला हवी.  घरातील लहान-मोठ्यांना, वरिष्ठांना धिर देणे, सायंकाळी सोबत बसून देवाचे स्तोत्र , रामरक्षा इत्यादी म्हटल्याने मनाला खूप धीर मिळतो. यात आनंद असा आहे की यामुळे सर्व कुटुंबीय एका वेळी एकत्र येतात. एका स्वरात प्रार्थना म्हणतात, तेव्हा घरामध्ये आपोआपच एक सकारात्मक जाणवू लागते. हा माझा स्वानुभव आहे. ह्या गोष्टीवर वाचकांनी देखील आवर्जून विचार करावा व ही सकारात्मकता अनुभवून पहावी. 
 
आपल्या सर्वांचे अंगी देवाने अनेक कला दिलेली आहे त्या जोपासून चित्र काढण्याचा, गायनाचा, सोशल मीडियावर किंवा युट्युब वर सुंदर व्याख्याने ऐकण्याचा प्रयत्न करणे हे आपणास अगदी सहज शक्य आहे. सतत येणाऱ्या ओळखीच्या लोकांच्या निधन वार्ता ऐकून मनाला प्रचंड वाईट वाटते, परंतु ही वेळ पार करताना आपल्याला एका सैनिकाची भूमिका ठेवणे फार गरजेचे आहे. युद्धात जसे सैनिकांचा सोबत असणारा सैनिक जरी शहीद झाला तरी दुसरा सैनिक धीर न सोडता आपले युद्ध सुरू ठेवतो आणि त्याचे युद्ध लढण्याच्या लढाऊ वृत्ती मुळेच तो जिंकतो देखील. सध्या आपल्याला असेच एका लढाऊ वृत्तीच्या सैनिकाचे कार्य करायचे आहे आणि हे आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण मनाने किंवा मनोबळाने सुदृढ असू. 
 
एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छितो की निधन पावलेल्या लोकांची संख्या जरी वाढत असली, तरीही लोकांचे बरे होण्याचे प्रमाण सुद्धा लक्षणीय आहे. आपले सरकार त्यादृष्टीने प्रयत्न देखील करत आहे.  तात्पर्य आपल्या ११व्या सवंगड्याला जर आपण खुश ठेवू शकलो तर मग आपण आपल्या ऑक्सिजन लेवल, आपला आनंद, आपल्या मनाची सक्षमता ही बऱ्याच पद्धतीने वाढवू शकतो. आपल्या अंगी असणाऱ्या कलेला वाव देऊन कलेच्या कलेने आयुष्यास आपण कलात्मक कलाटणी देऊ शकतो आणि आपल्या सर्वांना हे अगदी सहज शक्य आहे पण अर्थात मनात ठरवले तरच !!!!!
 
मध्यंतरी मी एक व्हिडिओ पाहिला होता ज्यात एक आजी दात नसतानादेखील माइक वर करा ओके लावून सुंदर गाणं म्हणत होते त्या आजींच्या चेहऱ्यावरील आनंद हा त्यांच्या गायकी गळ्यातली उतरला होता अशा आजींना पाहिले की तरुण वयात असणार्या आम्हा सर्वांना कसे जगावे हे नकळतपणे लक्षात येतेच. लेखाच्या उत्तरार्धात मी एवढेच म्हणेन की " एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ " हे वाक्य आपल्याला खरे करून दाखवायची सध्या वेळ आहे. सहाय्य हे घरातील सर्व व्यक्तींनी एकमेकांना करायचे आहे आणि अर्थातच हे सहाय्य/सहकार्य आपल्याला सरकारी यंत्रणांना देखील करायचे आहे. 
 
मनात जर कधी दडपण वाटलं, तर ते कुटुंबातील व्यक्तीं सोबत वाटायचे आहे, म्हणजेच दडपणाचं रूपांतरण हे डबक्यात साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यासारखा न होता नदीतल्या वाहत्या पाण्यासारखी निर्मळ होईल. तसेच गरज नसल्यास बाहेर न पडणं, बाहेर जाताना मास्क लावणं, सोशल डिस्टंसिंग चा वापर करणं, सॅनिटाईझरचा वापर करणे व सरकारी सूचनांचे पालन करणे या पद्धतीने आपल्याला सरकारी यंत्रणांना देखील सहकार्य करायचे आहे. विश्वास ठेवा आपण या रोगाला नक्कीच हरवू शकतो. त्यामुळे सकारात्मक राहण्याची ही कला आपण आपल्या अंगी रुजवून, कलात्मकतेच्या मार्गाने सकारात्मकतेकडे जाऊयात. 
 
आशा करतो की वाचकांना हा लेख नक्कीच आवडेल. सर्व वाचकांना व त्यांच्या परिवार जनांना उत्तम आरोग्य लाभो हीच भगवंत चरणी प्रार्थना.

आपलाच 
अमेय पद्माकर कस्तुरे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपमध्ये सर्वांत जास्त छळ गोपीनाथ मुंडे यांचा झाला- एकनाथ खडसेंचा आरोप