Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 26 April 2025
webdunia

कुसुमाग्रज : जीवन परिचय आणि पुरस्कार

Marathi Rajbhasha Din 2021
, शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021 (16:49 IST)
विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. कुसुमाग्रजांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ साली पुणे येथे झाला. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. कुसुमाग्रजांचे वडील वकील होते, वकिलाच्या व्यवसायासाठी ते पिंपळगाव बसवंत या तालुक्याच्या गावी आले, कुसुमाग्रजांचे बालपण येथेच गेले.
 
कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, एकुलती एक बहीण सर्वांची लाडकी म्हणून कुसुमचे अग्रज म्हणून 'कुसुमाग्रज' असे टोपणनाव त्यांनी धारण केले. तेव्हापासून शिरवाडकर कवी 'कुसुमाग्रज' या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले. 
 
नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए. ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३० मध्ये झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहात कुसुमाग्रज यांचाही सहभाग होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून झाली आहे. १९३३ साली त्यांनी 'ध्रुव मंडळा'ची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळीत, सत्याग्रहांमधे सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.
 
पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ.ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले, केवळ कवी असलेले वि.वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकार त्यांनी हाताळले.
 
१० मार्च १९९९ रोजी शिरवाडकरांचे निधन झाले.
 
वि.वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे ’कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे.
 
त्यांच्या नाशिकमधील टिळकवाडी येथील निवासस्थानी आता मराठी पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय आहे.
 
पुरस्कार
महाराष्ट्र सरकारचे उत्कृष्ट पुस्तकासाठीचे पुरस्कार
’मराठी माती’ला १९६० साली
’स्वगत’ला १९६२ साली
’हिमरेषा’ला १९६२ साली
’नटसम्राट’ला १९७१ साली
’नटसम्राट’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार (१९७४)
"ययाती आणि देवयानी" या नाटकास १९६६ या वर्षी तर संगीत "वीज म्हणाली धरतीला" या नाटकास १९६७ मध्ये राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले.
विशाखा कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार
भारत सरकारचा साहित्यक्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कार (१९९१ साली)
भारत सरकारचा ज्ञानपीठ पुरस्कार
अखिल भारतीय नाट्यपरिषदेचा "राम गणेश गडकरी" पुरस्कार त्यांना १९६५ मध्ये प्राप्त झाला‌.
अंतराळातील एका ताऱ्यास "कुसुमाग्रज" हे नाव दिले गेले आहे.
१९७४ साली 'नटसम्राट' नाटकाला 'साहित्यसंघ' पुरस्कार मिळाला.
१९८६ मध्ये पुणे विद्यापीठाने त्यांना 'डि.लिट्' ही सन्माननीय पदवी प्रदान केली.
१९८८ मध्ये संगीत नाटयलेखन पुरस्कार मिळाला.
 
वि.वा. शिरवाडकरांना मिळालेले सन्मान
१९६० मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदी निवड
१९६४ च्याच मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
१९७० साली कोल्हापूर येथे भरलेल्या ५१व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद
१९९० साली मुंबईत भरलेल्या पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे ते अध्यक्ष होते.
त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अन सुभाष देसाई यांनी हात जोडत काहीही न बोलता त्यांनी तेथून काढता पाय घेतला