Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वसंतोत्सव आणि भोजशाळा

वसंतोत्सव आणि भोजशाळा
PR
PR
मकर संक्रांतनंतर येणार्‍या माघ शुध्द पंचमीला वसंत पंचमी अर्थात निसर्गाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात असतो. वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरण आल्हाददायक होते. निसर्ग सोळा कलांनी फुलून, बहरून येतो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर भारतात व राजस्थानात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. निसर्गाची सुंदरता आणि मानवाची रसिकता यांचा समन्वय भावमिलन व सुरेख संगम म्हणजे वसंत ऋतू होय.

वसंत पंचमीला नवीन पिकाच्या रास घरातल्या देवाला अर्पण करण्याची प्रथा आहे. त्यानंतर त्या नवीन पिकापासून भोजन तयार करून देवाला नैवेद्य दाखविला जातो. सरस्वतीची जननी म्हणून या दिवशी तिची पूजा करतात. यादिवशी लक्ष्मीचाही जन्मदिन भाविक मानतात. त्यामुळे या तिथीला काही ठिकाणी श्रीपंचमी या नावानेही साजरी केली जाते.

महाराष्ट्र व मध्यप्रदेश यांना वेगळा करण्यार्‍या सातपुडा पर्वता आदीवासी बांधव मोठ्या उत्सहात हा सण साजरा करीत असतात.

धारचा वसंतोत्सव:
मध्य प्रदेशातील धार हे ऐतिहासिक शहर आहे. येथे फार प्राचीन भोजशाळा आहे. ती राजा भोज याच्या काळातील आहे. येथे वसंत पंचमी अर्थात निसर्गाचा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. माघ महिण्यातील पंचमीला येथे सरस्वतीचे उपासक यात्रेचे आयोजन केले जाते. धारसह मध्य प्रदेशातील भाविक याठिकाणी सरस्वती मातेची या दिवशी पूजा-अर्चा करता‍‍त.

राजा भोज हे सरस्वती देवीचे उपासक होते. त्यांच्या काळी सरस्वती देवीच्या साधनेला विशेष महत्त्व होते. त्या काळात सामान्य लोकही संस्कृतचे विद्वान असायचे. त्यामुळे त्याकाळी धार हे संस्कृत आणि संस्कृती यांचे केंद्रबिंदू होते. राजा भोज, सरस्वतीच्या कृपेने योग, न्याय, ज्योतिष, धर्म, वास्तुशास्त्र, राज्य-व्यवहार शास्त्र यासारख्या बर्‍याच शास्त्रात पारंगत होते.

भोजशाळा एका खुल्या मैदानात बांधली आहे. भोजशाळेच्या समोर एक मुख्य मंडप आणि मागच्या बाजूला एक मोठे प्रार्थना घर आहे. येथे वसंत पंचमीला भव्य यात्रा भरते. येथे होणार्‍या यज्ञवेदीत पडणारी आहुती आणि अन्य अनुष्ठाने पूर्वीच्या वैभवाची आठवण होते. नक्षीदार स्तंभ तसेच प्रार्थनागृहाचे नक्षीदार छत भोजशाळेच वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी दोन मोठे शिलालेख आहेत. या शिलालेखांवर संस्कृतात नाटक कोरलेले आहे. हे अर्जुन वर्माच्या काळात कोरलेले आहे.

या काव्यबध्द नाटकाची रचना राजगुरू मदन यांनी केली होती. ते विख्यात जैन विद्वान आशाधर यांचे शिष्य होते. या नाटकाचा नायक पूरंमंजरी आहे. हे नाटक धारच्या वसंतोत्सवात अभिनित करण्यासाठी लिहिले गेले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi