वडील तसं करतात आणि गायत्री 'बरी' होते. नवरा आभार मानण्यासाठी ज्यावेळी त्यांना भेटायला जातो, त्यावेळी ते सांगतात, गायत्रीची आई घसरूनही पडली नाही आणि तिला मीही ढकललं नाही... ते नेमकं काय सांगतात हा अनुभव प्रत्यक्षच घेण्यासारखा, कारण हा पटकथेचा कळस आहे. खरोखरीच निराळा असा हा चित्रपट आहे. माणसाचे मनोव्यापार कसे खोल, गुंतागुंतीचे असतात, ते जसे स्वतंत्र असतात तसे इतरांवर अवलंबूनही असतात. त्यांचं दर्शन एकाचवेळी स्तिमित आणि अस्वस्थ करणारं असू शकतं. हा चित्रपट असं दर्शन घडवतो. गिरीश जोशींच्या कथेच्या छोट्याशा जिवावर बांधेसूद पटकथा बेतलेली आहे आणि तिला नेमक्या दिग्दर्शनाने प्रेक्षणीय केलेले आहे.
पुऱूष कलावंत बरेच असूनही अश्विनी भावेने हा चित्रपट स्वतःच्या खांद्यावर पेलला आहे. ही अभिनेत्री दहा वर्षांच्या खंडांनंतर काम करीत आहे, हे जराही जाणवत नाही. सचिन खेडेकर, तुषार दळवी, डा.शरद भुथाडिया, सुलेखा तळवलकर ही पात्र निवड दर्जेदार आहे. सदाशिव अमरापूरकरांसाठी गायत्रीच्या वडिलांची भूमिका कारकिर्दीत विशेषत्वाने नोंदवून ठेवावी, अशी आहे. निळू फुले अगदी छोट्या भूमिकेत नेहमीप्रमाणे हातखंडा अभिनय करून जातात. 'नकार वागण्याला असू शकतो, अस्तित्वाला नाही...' असे संवाद लक्ष देऊनच ऐकण्यासारखे आहेत. प्रशांत दळवीं अपेक्षा पूर्ण करतात. चित्रपटात गीत न ठेवण्याचा निर्णय हुषारी दाखवणारा. रसभंग अजिबात होत नाही.
एक जराशी त्रुटी आहे. मुलगी मोठी होताना बापाच्या तिच्याशी भेटी झाल्याचे कोठेही सूचित होत नाही. बाप एकदम तिला मोठेपणी केवळ फोटोवरून ओळखतो, हे खटकते.
बुध्दिमान प्रेक्षकाला विचार करायला लावेल असा चित्रपट देऊन चंद्रकांत कुलकर्णींनी आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा `कदाचित` नव्हे, तर नक्कीच खोवला आहे. 'जिगिषा'ची निर्मिती नेहमीप्रमाणे दर्जेदार आहे. निर्माती अश्विनी भावेंनी वेगळी कथा निवडल्याबद्दल त्यांचेही विशेष अभिनंदन करायला हवे.