Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाचा संसर्ग थांबवायला तिसरा डोस घ्यावा लागणार?

कोरोनाचा संसर्ग थांबवायला तिसरा डोस घ्यावा लागणार?
, शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (08:29 IST)
मुंबईच्या केईएम रुग्णालयात MBBS च्या वर्गात शिकणाऱ्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतल्याची माहिती प्रशासनाने दिलीये.
 
लस घेतल्यानंतर कोरोनासंसर्ग झाल्याची प्रकरणं नवीन नाहीत. भारतात अनेकांना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनासंसर्ग झाल्याचं समोर आलंय.
 
कोरोनासंसर्गाची तिसरी लाट ऑक्टोबरमध्ये येण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. हा संभाव्य धोका पहाता, आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीचा तिसरा (बूस्टर) डोस द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
 
केंद्र सरकारने सद्यस्थितीत बूस्टर डोसची चर्चा 'समर्पक' नसल्याची भूमिका घेतलीये.
 
तिसऱ्या लाटेचा धोका पाहता बूस्टर डोस गरजेचा आहे? आरोग्य कर्मचाऱ्यांकडून बूस्टरची मागणी का होतेय? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
केईएम रुग्णालयात नक्की काय घडलं?
रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार, केईएम रुग्णालयातील पहिल्या वर्षात शिकणारी 6 आणि दुसऱ्या वर्षातील 23 मुलांना कोरोनाची लागण झालीये.
 
कोरोनासंसर्ग झालेल्या या विद्यार्थ्यांपैकी काहींना आजाराची कोणतीच लक्षणं नाहीत. तर, इतरांना अत्यंत सौम्य लक्षणं दिसून आली आहेत.
 
बीबीसी मराठीषी बोलताना केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख म्हणाले, "MBBS शिकणाऱ्या या मुलांना ब्रेक-थ्रू इंन्फेक्शन झालंय."
 
कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतरही झालेल्या कोरोनासंसर्गाला तज्ज्ञ 'ब्रेक-थ्रू इन्फेक्शन' म्हणतात.
 
विद्यार्थांना झालेल्या कोरोनासंसर्गानंतर पालिकेने इतर विद्यार्थी, कोरोना संक्रमित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेले व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतलाय.
 
आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये ब्रेक-थ्रू इन्फेक्शनचं प्रमाण किती?
जानेवारी महिन्यात देशात आरोग्य कर्मचाऱ्यांचं कोरोनाविरोधी लसीकरण सुरू झालं. आतापर्यंत देशभरातील 99 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीचा एक डोस मिळालाय. तर, 85 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याची माहिती आहे.
 
कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर अनेकांना कोरोनासंसर्गाची लागण झालीये. ज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
 
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यात
 
कोव्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेल्या 0.04 टक्के लोकांना कोरोनासंसर्ग झाला
तर कोव्हिशिल्डचे दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये हे प्रमाण 0.03 टक्के
दिल्लीतील मॅक्स रुग्णालय आणि केंद्र सरकारच्या इन्स्टिट्युट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजीने (IGIB) आरोग्य कर्मचाऱ्यांमधील ब्रेक-थ्रू इन्फेक्शनबाबत संशोधन केलं होतं.
 
लशीचे दोन्ही डोस घेतले अजूनही 25 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचं संशोधनात आढळून आलं
आरोग्य कर्मचाऱ्यांना हवाय बूस्टर डोस
भारतात कोरोनासंसर्गाची तिसरी लाट येण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीचा तिसरा (बूस्टर) डोस देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
 
देशात आरोग्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात कोरोनाविरोधी लस देणं सुरू झालं.
 
इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, "इस्राइल, यूके आणि अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, कोरोनाविरोधी लशीमुळे निर्माण झालेल्या अॅन्टीबॉडीज सहा ते आठ महिन्यानंतर कमी होऊ लागतात आणि हळूहळू संपतात."
 
रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने ब्रेक-थ्रू संसर्ग होण्याचा धोका वाढतो. अॅन्टीबॉडीज कमी झाल्याने आजार गंभीर स्वरूपाचा होऊ शकतो. युरोपातील अनेक देशांनी लशीचा तिसरा डोस देण्यास सुरूवात केलीये. तर, इस्राइलमध्ये चौथा डोस देण्यात येतोय.
webdunia
ते पुढे सांगतात, "कोरोनासंसर्गाच्या पहिल्या लाटेत भारतात हजारपेक्षा जास्त डॉक्टर बळी पडले. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी लशीचा तिसरा (बूस्टर) डोस दिला पाहिजे. तिसऱ्या डोसची अत्यंत गरज आहे."
 
खासगी डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनने केंद्राकडे तिसरा डोस देण्याची अधिकृत मागणी अजूनही केलेली नाहीये.
 
कोरोनाविरोधी लस घेतल्यानंतर झालेला कोरोनासंसर्ग सौम्य स्वरूपाचा असल्याचं आत्तापर्यंत दिसून आलंय.
 
याबाबत बोलताना IMA चे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर म्हणतात, "कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांचा जीव वाचवायचा असेल. तर, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी लशीचा तिसरा डोस दिला पाहिजे."
 
मुंबईतील इंटर्नल मेडिसिनतज्ज्ञ डॉ. हर्षद लिमये यांच्या सांगण्यानुसार, कोरोनाविरोधी लशीचा तिसरा डोस आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे.
 
ते म्हणतात, "आरोग्य कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस मिळाला पाहिजे. पण, जगभरात लशींचा अपूरा पुरवठा मोठी अडचण आहे. अनेकांना लशीचा पहिला डोसही मिळू शकलेला नाही. आम्हाला आशा आहे की केंद्र सरकार याबाबत सकारात्मक विचार करेल."
 
डॉ. भोंडवे पुढे म्हणाले, सहव्याधी असलेले रुग्ण, वयोवृद्ध नागरीक यांना बूस्टर डोस देण्यात आला पाहिजे.
 
तिसऱ्या डोससाठी रुग्णालयाचं मुंबई महापालिकेला पत्र
मुंबईच्या एच.एल हिरानंदानी रूग्णालयाने मुंबई महापालिकेला आरोग्य कर्मचाऱ्यांना तिसरा (बूस्टर) डोस देण्याची मागणी करणारं पत्र पाठवलंय.
 
हिरानंदानी रुग्णालयाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजीत चॅटर्जी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, "आरोग्य कर्मचाऱ्यांनी लशीचा दुसरा डोस घेऊन सहा महिने झालेत. आतापर्यंत अनेकांच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असेल किंवा संपली असेल."
 
तज्ज्ञांच्या मते, केंद्र सरकारचं दोन डोसचं धोरण योग्य आहे. पण, रुग्णांची सेवा करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करायला हवा.
 
बूस्टर डोसची चर्चा सद्य स्थितीत समर्पक नाही-केंद्र
आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाविरोधी लशीच्या तिसऱ्या डोसबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलंय.
 
इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी, "बूस्टर डोसची चर्चा सद्यस्थितीत समर्पक नाही," असं पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
 
ते म्हणाले, "सद्यस्थितीत देशातील सर्व प्रौढांना कोरोनाविरोधी लशीचे दोन डोस मिळाले पाहिजेत. हेच आपलं उद्दीष्ट असलं पाहिजे."
 
बूस्टर डोसबद्दल राज्यसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार म्हणाल्या, "सद्य स्थितीत बूस्टर डोस देण्याबाबत सरकारला तज्ज्ञांकडून कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. "
 
बलराम भार्गव यांनी पुढे सांगितलं, भारतात काही ठिकाणी लसीकरणानंतर अॅन्टीबॉडीज किती काळ रहातात यावर संशोधन करण्यात आलंय. यात आढळून आलंय की, "95 टक्क्यांपेक्षा जास्त अॅन्टीबॉडीज एक वर्षांपर्यंत रहातात," ते म्हणाले.
webdunia
कोरोनाविरोधात बूस्टर डोसची गरज का आहे?
लशीचा डोस घेतल्यानंतर कालांतराने रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे बूस्टर डोसची गरज भासू शकते, असा तर्क लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून दिला जातोय.
 
ऑल इंडिया इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले होते की, कालांतराने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे बूस्टर डोसची गरज आहे.
 
लशीचे दोन डोस घेऊनही कोरोना होण्याचं कारण काय?
लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोना का होतो? माध्यमांशी बोलताना डॉ. संजय ओक याच्या शक्यता समजावून सांगतात.
 
पहिली शक्यता म्हणजे लशीचा दुसरा डोस घेताना लोक असिप्टोमॅटीक पॉझिटिव्ह असतात. टेस्ट न केल्याने त्यांना ते कळत नाही. लस घेतल्यानंतर लक्षणं दिसू लागतात. त्यानंतर टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह येते.
तुमच्या शरीराने दिलेलं प्रत्युत्तर पॉझिटिव्ह टेस्टच्या स्वरूपात तुमच्या निदर्शनास आलंय
तज्ज्ञ म्हणतात, कोरोनाविरोधी दोन्ही लशी घेतल्यानंतर कोरोनासंसर्ग होऊ शकतो.
 
अमेरिकेत ब्रेकथ्रू इन्फेक्शनचं प्रमाण
भारतातच ब्रेक-थ्रू इन्फेक्शन होतंय, अशातला भाग नाही. 26 एप्रिल 2021 पर्यंत अमेरिकेत 95 लाख नागरिकांचं लसीकरण झालं होतं. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) संस्थेनुसार यापैकी 9,045 लोकांना पुन्हा संसर्ग झाल्याचं आढळलं.
 
जगभरातील कोणत्या देशात देण्यात येतोय बूस्टर शॅाट?
यूके सरकारच्या माहितीनुसार, सप्टेंबरपासून लोकांना बूस्टर शॅाट देण्यास सुरूवात केली जाणार आहे. टाईम्स ऑफ इस्रायलमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, इस्राईल सरकारने 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना बूस्टर डोस देण्यास सुरूवात केलीये.
 
जर्मनी आणि फ्रान्समध्येही लोकांना बूस्टर डोस देण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती आहे.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर