Publish Date: Sun, 05 Mar 2023 (22:39 IST)
Updated Date: Sun, 05 Mar 2023 (22:49 IST)
उन्हाळ्यात पहाटे माठातील पाण्याचे सेवन करावे. फ्रिजचे पाणी पिऊ नये. यानंतर फिरायला जावे, कपाळावर घाम येईपर्यंत व्यायाम करावा.
काळी माती हे एक श्रेष्ठ रसायन आणि बहुगुणी आहे. त्यात पाणी घालून त्याचा लेप लावावा. नंतर अंग धुऊन घ्यावे किंवा अंगास हळद पावडर, तीळ आणि आवळकाठी पावडर दूध मिश्रीत लेपाने लावावे, नंतर गार पाण्याने स्वच्छ स्नान केल्याने रंध्रे मोकळी होतात. यामुळे शरीर हलके आणि निरोगी बनते.
तेलकट आणि तुपकट पदार्थ तसेच टाळावे तसेच शिळे अन्न, मद्य, मांसाहार सर्वथा टाळावा. याऐवजी मोड आलेले चणे, मूग, मेथ्या, द्विदल धान्याच्या उसळी किंचीत चटकदार लावून खाल्ल्याने आरोग्याचे संवर्धन होते.
भाकरी, पोळी, कोबी, लाल टोमॅटो, कच्ची कोशिंबीर, ताक, जेवणाच्या शेवटी दही, आंब्याची किंवा चिंचेची चटणी असा आहार असावा. अशा आहारात पाणी पिण्याची गरज पडत नाही. कारण या सर्व पदार्थांत जलतत्त्व भरपूर असते. आमरसही घ्यावा.
रात्री पोळी भाजी, कच्ची कोशिंबीर, भात आणि मूगडाळीचे वरण, असा ताजा आणि गरम आहार घ्यावा. उन्हाळा हा तसा शरीर निरोगी ठेवण्याचा काळ आहे,हे लक्षात घ्यावे.