Publish Date: Sat, 14 Jul 2018 (14:26 IST)
Updated Date: Sat, 14 Jul 2018 (14:32 IST)
एका अरण्यात एक सिंह राहात होता. त्या अरण्यात तो एकटाच शक्तीशाली असल्यामुळे वाटेल तसा वागत असे व तेच योग्य असे म्हणत असे. एकदा सर्व प्राण्यांना एकत्र बोलावून तो म्हणाला, 'प्रत्येकाने मला आपल्या शक्तीप्राणे खाद्य पुरवावं म्हणजे रोज शिकार करण्याचा माझा त्रास वाचेल.' सगळ्यांनी ही गोष्ट मान्य केली. पण हा कर कोणत्या धोरणाने बसवावा याबद्दल निश्चित पद्धती ठरेना. वाघ उभा राहून म्हणाला, 'मला वाटतं, कोणी किती पाप केलं ते पाहून त्या मानाने त्याच्यावर कराची आकारणी करावी, प्रत्येकाने आपल्या शेजारवरील कराची आकारणी करावी म्हणजे फसवेगिरीला जागा राहणार नाही.' त्यावर हत्ती लगेच म्हणाला, 'छे, छे, वाघोबाची ही युक्ती निरुपयोगी आहे. त्यामुळे द्वेष, जुलूम वाढतील. माझ्या मते प्रत्येकाचे सद्गुणावर कर बसवावा व तो ज्याचा त्यानेच द्यावा. अशा योजनेने सरकारी तिजोरीत पुष्कळ भर पडेल.'
तात्पर्य : आपले दुर्गुण असतील तर ते झाकून ठेवायचे व थोड्याशा सद्गुणाचे मोठे प्रदर्शन करायचे असा प्रत्येकाचा स्वभाव असतो.