Publish Date: Fri, 19 Sep 2025 (20:30 IST)
Updated Date: Fri, 19 Sep 2025 (19:05 IST)
Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक शेतकरी त्याच्या कुटुंबासह एका गावात राहत होता. एकदा शेतकर्याने आपल्या मुलांना अंडी खायला मिळावीत म्हणून एक कोंबडी विकत घेतली. काही दिवसांनी तिने अंडी द्यायला सुरूवात केली. आणि काही आश्चर्य तिने पहिलेच अंडी सोन्याचे दिले. ते बघून शेतकरी आनंदित झाला. त्याने ते अंडी बाजारात नेऊन विकले. त्याला खूप पैसे मिळाले. दुसर्या दिवशीही कोंबडीने सोन्याचे अंडी दिले.
आता काय तो एकदम खूश झाला. तेही अंडी त्याने बाजारात विकले. अशा प्रकारे कोंबडी रोज एक सोन्याचे अंडी देऊ लागली. तो ते बाजारात विकू लागला. रोज मिळणार्या पैशांमुळे त्याची परिस्थिती बदलू लागली. तो चांगले जीवन जगू लागला. हे पाहून त्याने एक दिवस विचार केला की, कोंबडी जर रोज सोन्याचे अंडी देत असेल तर तिच्या पोटात कितीतरी सोन्याची अंडी असतील.
शेतकरी आता अति विचार करू लागला. कोंबडीला मारून तिच्या पोटातली सर्व अंडी काढून विकली तर खूप श्रीमंत होऊ असे त्याला वाटले. त्या हव्यासापायी त्याने त्या कोंबडीला मारले.
पण कोंबडीच्या पोटात त्याला एकही सोन्याचे अंडी सापडले नाही, तो उदास झाला. कोंबडी मेल्यामुळे त्याला आता रोजचे सोन्याचे अंडी मिळणेही बंद झाले. व त्याला खूप पश्चाताप झाला.
तात्पर्य : अतिलोभ नेहमी वाईट असतो व नुकसान होते.
Edited By- Dhanashri Naik