एका भक्ताला एकदा त्याचा देव भेटतो. देवाला पाहून भक्त त्याला नमस्कार करून धन्यता मानतो. त्यावर देव म्हणतो, "माग तुला काय हवे ते!' भक्त म्हणतो, "परमेश्वरा, तुझे दर्शन घडले बस्स. बाकी काही नको!' त्यावर देव त्याला सोबत येण्यास सांगतो.
दोघेही मिळून एका समुद्रकिनारी पोचतात. तेथे वाळूवर चित्रपटातील पडद्याप्रमाणे एक पडदा भक्ताला दिसतो. देव त्याला म्हणतो, "बघ, तुझे आतापर्यंत आयुष्य मी तुला या पडद्यावर दाखवतो.'
त्यानंतर भक्ताच्या आयुष्यातील चांगल्या-वाईट घटना एकामागून एक दिसू लागतात. चांगली घटना दिसल्यावर समोरच्या वाळूवर चार पावले दिसू लागतात. भक्त म्हणतो, "देवा माझ्या चांगल्या काळात तू माझ्या सोबत होतास.' त्यानंतर वाईट घटना दिसू लागते. त्यावेळी मात्र वाळूत केवळ दोनच पावले दिसतात. भक्त देवाला म्हणतो, "देवा माझ्या चांगल्या काळात तू माझ्या सोबत होतास मात्र वाईट काळात तू निघून गेलास.'
त्यावर देव शांतपणाने म्हणतो, "अरे, ती दोन पावले तुझी नाहीत. ती माझी पावले आहेत. तुझ्या अडचणीच्या वाईट काळात मी तुला कडेवर उचलून घेतले होते.'