Publish Date: Thu, 08 Jun 2023 (08:48 IST)
Updated Date: Thu, 08 Jun 2023 (09:03 IST)
अनेकदा अनेक प्रश अगदी कंठाशी येतात,
विचारावसं वाटतं पण ते तिथंच अडकतात,
का कुणास ठाऊक, त्यावेळी नेमकं काय होतं,
आपण कुणाचं मन जपता जपता, इतकं दुबळ का होतो?
वाटतं विचारलं काही खडसावून की तुटेल आतून काही,
मग ते जोडण्याची संधी येईल की नाही!
मग तो प्रश्नच आपल्या मनात घर करतो,
अन आपणच त्या प्रश्नात अडकून पडतो.
अधिकार नसतो असं अजिबातच नसतं,
पण नंतरच्या प्रसंगास मन धास्तावलेलं असतं.
हेंच चालतं वर्षानुवर्षे एखाद्या च्या बाबतीत,
घडी शाबीत ठेवायला,प्रश्नच ठेवायला लागतात अनुत्तरित!