मी म्हणालो,
तो चंद्र मेघांनी माखला.
तू म्हणालीस,
भोवती किती अंधार साचला.
मी म्हणालो,
फुल किती छान
तू म्हणालीस,
सारं सारखंच, फूल असो की पान.
मी म्हणालो,
आभाळातली रत्नं वेचू.
तू म्हणालीस,
तारे कसे असतील मोती किंवा पाचू ?
मी म्हणालो,
ऐकलास का, मौनाचा गुंजारव ?
तू म्हणालीस,
कोलाहलाची तहान भागव.
मी म्हणालो,
लागला का, शब्दांचा थांग ?
तू म्हणालीस,
यमक कुठाय ते सांग.
शब्द माझे बोलले
भावनेची भाषा.
तुला मात्र होती
छंदांचीच आशा.
तुला उमजले नाही,
ते मला कळले होते.
तुझ्या नी माझ्या आयुष्याचे
यमक टळले होते !