Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील २९ मान्यवरांना पुरस्कार वितरण

महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील २९ मान्यवरांना पुरस्कार वितरण
जयसिंगपूर , मंगळवार, 31 मे 2016 (10:34 IST)
(कवितासागर वृत्तसेवा) महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील ग्रामीण  पत्रकारांचा स्नेहमेळावा आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या २९ मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन रविवार दिनांक २९ मे २०१६ रोजी दुपारी १२ वाजता सांगोला बस स्थानकाजवळील अजिंक्य प्लाझा येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. वेळी राज्यातील नामवंत पत्रकार आणि विविध क्षेत्रातील आदर्श योगदान देणा-या सेवाभावी व्यक्तींना पत्रकार भुषण व अन्य विविध प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
 
कोणताही माणूस कामामध्ये कितीही मग्न असला तरी त्याला वर्तमानपत्र वाचल्याशिवाय चैन पडत नाही. ग्रामीण भागातील पत्रकार असो अथवा शहरातील असो सर्वांनी सकारात्मक भूमिका मांडून समाजाचा, गावाचा, तालुक्याचा जिल्ह्याचा विकास साधण्याचा प्रयत्न करावा. चुकीच्या गोष्टीला चूक आहे असे म्हटलेच पाहिजे. आज पत्रकारिता करणे खूप अवघड ठरत आहे. ग्रामीण भागातील लोकसंख्या कमी होत असून लोक शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. समाजाचे ऋण फेडण्यासाठी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करणे महत्वाचे वाटते. असे विचार माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार विजयसिंह पाटील यांनी  प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला, जिल्हा - सोलापूर येथे व्यक्त केले.  
 
या प्रसंगी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या दशकपूर्ती सोहळा व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार गणपतराव देशमुख तर पाहुणे म्हणून श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्राचार्य - अभयकुमार साळुंखे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. एकनाथ बिरवटकर, माजी आमदार दीपकआबा साळुंखे - पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष शंकराव शिंदे आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रशांतराव मोहिते आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
 
माणदेशाची संस्कृती व परंपरा मोठी आहे. या भागात पत्रकारांची संख्या मोठी आहे. पत्रकारांनी ग्रामीण भागातील प्रश्नांबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील प्रश्नांना वाचा फोडावी. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार गणपतराव देशमुख यांनी व्यक्त केले. 
 
या वेळी एकनाथ बिरवटकर यांनी ग्रामीण पत्रकारांना मार्गदर्शन करून महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या दहा वर्षाच्या कार्याचा आढवा मांडला. या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात आदर्श योगदान देणा-या एकूण २९ मान्यवरांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. कै. यशवंत पाध्ये पुरस्काराने कराड येथील दैनिक प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील यांना गौरविण्यात आले. 
 
मोहन म्हस्के (सांगोला), प्रमोद सुकरे (कराड), सतीश सावंत (सांगोला), साप्ताहिक कवितासागरचे कार्यकारी संपादक - मंगेश विठ्ठल कोळी (शिरोळ), आणि अशोक उध्यावर (पालघर) या पाच पत्रकारांना पत्रकार भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 
 
गिरीश नष्टे (सांगोला), डॉ. शिवाजीराव ढोबळे (बलवडी), जयसिंग गायकवाड (त्रीशुर), आणि अरुण बोत्रे (सांगोला) या चार मान्यवरांना समाज भुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. 
 
रामचंद्र दादा जरे (आटपाडी), प्रविणकुमार जगताप (कराड), आणि राजेश रामराव सातारकर (आटपाडी) या तीन मान्यवरांना उद्योगश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
 
सातारा येथील प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ यांना जीवनगौरव पुरस्कार, बारामतीचे तहसीलदार निलप्रसाद चव्हाण यांना उत्कृष्ठ प्रशासक पुरस्कार, तर चंद्रकांत नामदेव पवार (तांदुळवाडी) आणि बबन तुकाराम पाटील (चोपडी) या दोन मान्यवरांना कृषिरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 
 
डॉ. सुप्रिया प्रशांत सातपुते (जयसिंगपूर), सौ. सुवर्णा दिलीपकुमार इंगवले (सांगोला), पांडुरंग नारायण शिंदे (पंढरपूर), बोधीप्रकाश गायकवाड (सोलापूर) आणि उत्तमराव शिंदे (बलवडी) या मान्यवरांना शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर गोमाता आनंदाश्रम सेवा संस्था, आटपाडीचे संचालक श्री. तात्यासाहेब रामचंद्र गायकवाड यांच्या विधायक कार्याचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  
 
जयसिंगपूर येथील डॉ. सुनील दादा पाटिल यांची महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा कोल्हापुर जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल खासदार व माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटिल यांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
 
वर्ल्ड सामनाचे संपादक - प्रकाश कोलते (श्रीरामपूर), कवितासागर अॅन इंटरनॅशनल जर्नल ऑफ पोयट्री या अव्वल दर्जाच्या वाङमयीन दिवाळी अंकाचे संस्थापक संपादक - डॉ. सुनील दादा पाटील (जयसिंगपुर), आणि अक्षर भेटचे संपादक - सुभाष सुर्यवंशी (मुंबई) यांना सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.  पुरस्काराचे स्वरुप स्मृतिचिन्ह शाल आणि सांगोला तालुक्याचे प्रतिक म्हणून डाळिंबाचे रूप इत्यादी असे होते.
 
महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा दशकपूर्ती सोहळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभास सांगोला शहर, तालुका व परिसरातील पत्रकार, विविध क्षेत्रातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
 
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व् दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रशांतराव मोहिते यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी पाटील आणि व डॉ. कुमार पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार शंकर शिंदे यांनी मानले. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टिप्स: प्रेग्नेंसीमध्ये या गोष्टींकडे लक्ष्य ठेवा