अशोक देवदत्त उपाख्य अप्पा टिळक गेले ...जवळपास नऊ दशकांचा एक धगधगतं, अस्वस्थ व्यक्तित्व देवबाप्पाच्या उजव्या बाजूला विसावण्याठी निघून गेलं...स्मृतीचित्रे आणि ना. वा. टिळक यांचे जीवनकार्य, हाच 'ध्यास' झाललं एक कृतार्थ आयुष्य अप्पांच्या मृत्यूमुळे लौकिकातून निघून गेलं. मराठी साहित्यात स्मृतीचित्रे' नावाच्या ताजहालाच्या निर्मातीच्या म्हणजेच लक्ष्मीबाईं टिळकांच्या अनेकानेक आठवणींचा आनंद-ठेवा काळजात जपणारं एक मनस्वी व्यक्तित्व काळाच्या पडाआड गेलं...नाशिकच्या जुन्या बसस्थानकाजवळचं टिळकांचं शांतीसदन आता कायचं शांत झालं...ज्यांचं चिडणं, रागावणंही हवंहवंसं वाटावं असं नाशिकधील आणखी एक व्यक्तित्व, अनेकांचा आधारवड काळाने ओढून नेला.
नाशिकध्ये असलेल्या ख्रिस्ती कबरस्तानात लक्ष्मीबाई टिळकांच्या समाधीचा ठावठिकाणा शोधण्यासाठी अप्पांनी जिवापाड मेहनत घेतली. त्यासाठी त्यांनी नगरचे इतिहास संशोधक सुरेश जोशी यांना नाशिकला खास बोलावून घेतलं. कबरस्तानाची देखभाल करणारा मुलगा तर त्यांचं लेकरूच झालं होतं त्या वेळी ! त्या काळात नाशिकच्या नॅशनल उर्दू शाळेच्या रस्त्यावरून काठी टेकत टेकत येणारी अप्पा टिळकांची ठेंगणी, ठुसकी, शुभ्र दाढीधारी मूर्ती अनेकदा दिसत असे. एकदा याच रस्त्यावरून भर उन्हात ते येत होते. त्यांना पाहून मी स्कूटर थांबवून विचारलं, अप्पा, इतक्या उन्हात इकडे कसे काय ? अप्पा म्हणाले, असे बाबा, त्या लक्ष्मीबाई हाका मारतायत ना मला ! त्यांना शोधायला जायला नको ?
हे काम पूर्ण करता करताच अप्पांनी रेव्हरंड टिळकांवर 'चालता बोलता चमत्कार' ही कादंबरी काही वर्षांपूर्वीच लिहिली होती. 'स्मृतीचित्रे' कार लक्ष्मीबाईंबरोबरच फुलामुलांचे कवी ना. वा. टिळक यांचा नातू अशीही आपली ओळख असावी यासाठी अप्पांची तळळ असे. ते म्हणत, लक्षुंबाई (हाही खास अप्पांचा शब्द !) तर मोठ्या खर्याच. पण रेव्ह. टिळकांचे कार्यही तेवढंच मोठं आहे. आपल्या लोकांकडून ते का दुर्लक्षित होते...व्हावे ? 'चालता बोलता चत्कार' साठी अप्पांनी वयाच्या ऐंशीतही प्रचंड मेहनत घेतली. त्याचा काही काळ साक्षीदार होण्याचं भाग्य मलाही मिळालं. त्या कादंबरीत टिळकांचं अस्सल व्यक्तीचित्र उभं रहावं, यासाठी अप्पांनी काय काय केलं नाही? टिळक जेथे जेथे गेले त्या-त्या गावांना अप्पांनी भेटी दिल्या. नागपूर, राहुरी, सातारा, मुंबई आणि अर्थातच नगर!
मराठी साहित्य रसिकांना रेव्ह. टिळक म्हणजे 'सृष्टी तुला वाहुनी धन्य होते,' 'कुणास्तव, कुणीतरी,'' अशा कवितांबद्दलच माहिती असतात.पण त्या पलीकडे आणि स्मृतिचित्रांतूनही न दिसणारे टिळक होतेच की !! रेव्ह. ह्यू यांचे मानसपुत्र टिळक, पुष्कळ अजुनी उणा प्रभूजी यासारख्या भक्तिरचना करणारे टिळक, ख्रिस्ती-मराठी कीर्तन परंपरा सुरू करणारे टिळक, पहिल्या एतद्देशीय ख्रिस्ती धर्मगुरूंपैकी एक असलेले टिळक, नगर आणि सातार्याची चर्चेस बांधलेले टिळक, शीघ्रकोपी तितकेच लवकर शांत होणारे टिळक, संस्कृतवर प्रचंड प्रभुत्व असलेले 'उद्भट विद्वान' टिळक, अशी टिळकांची अनेक रूपे आहेत. ती मराठी साहित्य रसिकांसोर आणण्याचे काम अप्पांनी चोखपणे केले. त्यांचे सारेच का आखीव रेखीव. मुद्दा पाठ असल्याशिवाय हा माणूस कागदाला पेन लावायचाच नाही मुळी !
अप्पा स्वतःही अखेरपर्यँच चालता-बोलता राहिलेला चमत्कारच होते ! नगरपासून (व्हाया नाशिक रोड मुद्रणालय) तारापूरपर्यंतच्या अनेक संस्थांत अनेक नोकर्या केलेला हा माणूस. 'सावाना'तला एखादा कार्यक्रम असो, कोण्या मान्यवराची स्वाक्षरी घेऊन आपले 'बीडीबी' (बर्थ डे बुक) समृध्द करणे असो, की सर्कल-विकास चित्रपटगृहाजवळील कृष्णाईच्या खास साबुदाणा खिचडीचा आस्वाद घेणे असो, दाढीधारी अप्पा हळूहळू तिथे पोचायचेच! बरे, बोलणेही फार मिश्किलपणाचे. बोलता बोलता सपकन् असा एखादा टोमणा हाणणार की सोरच गपगारच ! त्यांचे बर्थ डे बुक म्हणजे त्यांच्या चिकाटीचा उत्तम नमुना होता. या बीडीबी मध्ये अनेक मान्यवरांची स्वाक्षरी व त्यांची जन्मतारीख आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी एक व्यंगचित्रही त्या वहीत उत्स्फूर्तपणे काढून दिलं आहे. याशिवाय आयुष्यातील कडू-गोड आठवणींचं संकलन आणि आयुष्यात अप्पांनी भल्याभल्यांशी घेतलेल्या साहित्यिक 'टकरां'चं वर्णन असलेलं 'टक्करमाळ'सारखं आत्मवृत्त हेही अप्पांच्या लेखणीतून उतरलेल्या साहित्यकृतींपैकी आहे! सावानाच्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याचा हा अखेरपर्यँतचा निष्ठावंत वारकरी होता.
अनेक आठवणी दाटतात...एकदा ते असेच अशोक स्तंभावर कृष्णाईजवळ साबुदाणा खिचडी खात बसले होते. वेळ सकाळी ११ ची. एकदा मी शहर कार्यालयातील सकाळची बैठक संपवून सहकार्यांसह चहा पिण्यासाठी निघालो होतो. अप्पांना पाहून थांबलो. तोवर खिचडी खाऊन झालेल्या अप्पांची जाण्याची लगबग सुरू झाली. त्यांना म्हटलं काय घाई आहे अप्पा. जाल की सावकाश. त्यावर ते म्हणाले अरे तुला माहिती नाही, घरी आमच्या सासूबाई येतात एव्हाना. मी नसलो तर त्या रागावतील. आम्हाला कळेनाच, ऐंशी वर्षाच्या या गृहस्थांच्या या सासूबाई कोण आल्या नवीनच ? त्यावर दाढीतल्या दाढीत हसत अप्पा म्हणाले, अरे आमच्या सासूबाई रोज सकाळी माझ्याकडे येतात. घर साफसूफ करतात, स्वैंपाक करतात, धुणीभांडीही करतात....तेव्हा आम्हाला उलगडा झाला की यांच्या कामवालीला अप्पांनी नाव दिलंय सासूचं ! (कोणत्याही पुरूषाच्या नातं आपल्या सासूला याच्याइतकी चांगली व सुरेख उपमा दुसरी कोणती असू शकते ...!)
माझी व अप्पांची व्यक्तिगत ओळख तशी अलीकडची, म्हणजे गेल्या तेरा -पंधरा वर्षांतली. पत्रकारिता हा धंदा म्हणून निवडल्यानंतर पोटासाठी भटकत नाशिकसाध्ये आलेल्या माझ्यासारख्या एका तरूण पत्रकाराशी अप्पांनी स्वतःहून बोलण्याचे खरे तर काहीच कारण नव्हते. पण एका सायंकाळी झालेल्या 'सावाना'तल्या त्या पहिल्या भेटीपासूनच अप्पांनी माझ्यावर जिव्हाळ्याची आणि कळवळ्याची छत्रछाया धरली. अनेकदा ते माझ्यावर रागावले की मुक्ताताई आमच्यात सेट करीत ! 'स्मृतिचित्रे'चं लेखन लक्ष्मीबाईंनी जेथे बसून केलं, तो नाशिकच्या कान्हेरेवाडी भागातला बंगला म्हणे कोणा वैशंपायनाचा होता ! त्यामुळेही अप्पांना माझ्याबद्दल एका प्रकारचा स्नेह वाटत असेल. नगरचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ख्रिस्तवासी रामकृष्णपंत मोडक यांच्याशी असलेल्या माझ्या जवळच्या नात्यामुळेही कदाचित त्यांचा माझ्यावर विशेष लोभ असावा. किंबहुना, लोभ होता म्हणण्यापेक्षा त्यांचं माझ्याकडे 'बारीक' लक्ष होतं. माझ्यावर त्यांचा काय व कसा हा लोभ होता माहिती नाही, पण १९९६ पासून अगदी अखेरपर्यंत मी लिहीलेला प्रत्येक लेख, प्रत्येक फीचर अचूक असावं असा त्यांचा आग्रह असे. त्यात काही जरी इकडेतिकडे झालं तरी ते रागावून फोन करायचे. चिडले की मला ते म्हणायचे, अरे काय लिहिलंस हे असं तू? असे काही तरी लिहू नकोस. एखाद्या शब्दानेही फार फरक पडतो बाबा ! आपला प्रत्येक शब्द आणि प्रत्येक पाऊल सांभाळूनच टाकावं...कितीही मोठा झाला तरी माणसानं ना, जीभ आणि पाऊल फार सांभाळावं बरं... एकदा घसरलं की घसरलं...!
माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराच्या आयुष्यात अशी काही व्यक्तित्वं आणि त्यांची अशी काही वाक्यं हा केवढा अमूल्य ठेवा असतो, नाही?