परशुरामाचे जन्मस्थळ-जलालाबाद
उत्तरप्रदेशातील शाहजहानपूरपासून तीस किलोमीटरवर असलेल्या जलालाबाद येथे भगवान परशुरामाचे जन्मस्थळ आहे. हजारो वर्षापासून परशुरामपुरी’ म्हणूनच ते ख्यातनाम आहे. मुगल काळात रोहिल्यांचा सरदार नजीब खॉं याचा मुलगा रहमत खॉंच्या धाकट्या मुलाच्या (जलालुद्दीन) नावावरून जलालाबाद असे नाव ठेवले होते. मात्र अजूनही अनेक ठिकाणी परशुरामपुरी असेच लिहिलेले आढळते. परशुरामांचा जन्म येथेचे झाला होता, असा येथील लोकांचा ठाम विश्वास आहे. त्रेतायुगात हे ठिकाण कान्यकुंज राज्यात होते. इतिहास काळात रोहिला सरदार नजीब खॉंचा मुलगा हाफिज खॉं याने या भागात एक किल्ला बांधला होता. याच किल्ल्याच्या ठिकाणी सध्या तहसील कार्यालयाची इमारत आहे. हाफीज खॉंने धाकटा मुलगा जलालुद्दीनचा विवाह येथील अफगाणी कबिल्यात केला होता. त्यांनी हा भाग आपल्या मुलीला हुंड्याच्या स्वरूपात दिला होता. तेव्हापासून नगरीचे नाव परशुरामपुरी बदलून जलालाबाद असे ठेवले होते. येथे भगवान परशुरामाचे प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या गाभार्यात शिवलिंग आहे. समोरच भगवान परशुरामाची प्राचीन मूर्ती आहे. परशुरामाने येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यानंतर भाविकांनी या मंदिराचे बांधकाम केले होते, असे मानले जाते. मंदिर 30 फूट उंचीवर बांधण्यात आले असून मंदिराची उंची हे प्राचीनतेचे उदाहरण आहे. अनेक वेळा हे मंदिर तोडण्यात आले आणि भक्तांनी पु्न्हा या मंदिराचा जीर्णोद्धार केला. जीर्णोद्धारावेळी ढिगार्याखाली परशुरामाशी संबंधित अनेक वस्तू सापडल्या. एकदा मंदिराच्या ढिगार्याखाली आठ
फूट उंच आणि अडीच फूट रूंदीचा परशू सापडला होता. तो आजही मंदिराच्या उजव्या बाजूला आहे. सत्ययुगाच्या शेवटी परशुरामाने अवतार घेतला होता असे मानण्यात येते. रोहिणी नक्षत्रात परशुराम याच भागात जन्मले होते. त्यांचे वडील मदग्नी यांचा जन्म येथेच झाला होता असे सांगितले जाते. परशुरामाची आई रेणुका दक्षिण देशाची राजकुमारी होती.
आजही परशुराम मंदिराच्या पश्चिमेला दाक्षायणी किंवा ढकियान मंदिर आहे. हे रेणुकांचे निवासस्थान असल्याचे सांगितले जाते. परशुरामाने आपल्या वडिलांसाठी रामगंगा आणली होती. जिगदिनी नावाचा झरा जमदग्नीचे स्मरण करून देतो. त्रेतायुगात क्षत्रिय राजांचा परशुरामाने विनाश केला होता. आणि ऋषी-मुनींचे संरक्षण करून तलाव खोदला होता. परशुरामाद्वारे खोदलेला हा तलाव धनुष्याकार असून रामतलाव नावाने प्रसिद्ध आहे. परशुराम मंदिराच्या समोर आजही हा तलाव आहे. येथील पश्चिम दिशेला असलेले कटका-कटकिया आजही कंटकपुरीची आठवण देतात. पपरशुरामाने पृथ्वी निःक्षत्रिय करण्याचा पण केला होता. २१ वेळा त्याने पृथ्वी निःक्षत्रिय केली होती, असे मानले जाते. त्यातच त्याने सहस्त्रबाहू राजाचे सैनिक व त्याच्या पुत्रांची परशूने खांडोळी केली होती. याशिवाय दिउरा, जमुनिया, उबरिया इत्यादी ठिकाणे परशुरामाशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. परशुरामाच्या मंदिरात सर्व भाविकांची मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे.. नगरातील नवविवाहित वधू वर सर्वप्रथम या मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी येतात. दूर-दूरवरून मुंज, अन्नदानासाठी लोक येथे येतात. सध्या मंदिराचे महंत सत्यदेव पांडे असून त्यांच्या कार्यकाळातच मंदिराचा विकास झाला. यामध्ये नवीन इमारत, नवदुर्गाची स्थापना आणि चोवीस अवतारांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. भगवान परशुरामाचे पूर्वज भार्गव ऋषिगण भृगु, शुक्राचार्य, च्यवन, दधीची, मार्कण्डेय आदी फिरस्ते होते. सहावा अवतार असलेल्या परशुरामाचे वडिल जमदग्नीचे आश्रम देशातील कानाकोपर्यात होते. परशुरामाचे जन्मस्थळ नेमके कोणते याबाबत
वाद आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशाच्या गाझीपूर जिल्ह्यातील जमनिया, मेरठ जिल्ह्यातील पुरा महादेव परशुरामेश्वर, वाराणसी जिल्ह्यातील भार्गवपूर व जलालाबाद शहाजहानपूर, राजस्थानमधील चित्तोड जिल्ह्यातील मातृकुंडिया, हिमाचल प्रदेशातील ददाहु जिल्हातील रेणुका तीर्थ आणि मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर जवळ असलेले जानापाव या ठिकाणांना परशुरामाचे जन्मस्थळ असल्याचे मानण्यात येते.