लग्न ठरवायला किंवा आपला मनपसंत जोडीदार निवडायला मदत करणार्या ‘शादी डॉट कॉम’ या वेबसाईटने एक वेगळाच निष्कर्ष समोर आणला आहे. त्यांच्या मते या साईटवर मनपसंत जोडीदार निवडण्यासाठी येणार्या 54 टक्के मुला-मुलींनी एकत्र कुटुंबात राहणार्या जोडीदाराला पसंती दर्शवली आहे. यात मुलींची संख्या लक्षणीय आहे. कारण काहीही असो पण एकीकडे एकल कुटुंबात जन्मलेल्या आणि नात्यांना मुकलेल्या मुला मुलींना आता माणसं हवीशी वाटत आहेत. लहानपणापासून घरात एकटेच वाढलेले किंवा विभक्त कुटुंबात वाढलेले मुलं-मुली आपल्या संसाराचा जेव्हा विचार करू लागली आहेत तेव्हा त्यांना एकत्र कुटुंब असावं असं वाटत आहे. म्हणजे भारतीय संस्कृतीचा जो पाया आहे तो अजूनही भक्कम आहे असं म्हणायला हरकत नाही.
आज एकत्र कुटुंबाची एवढी मोठी क्रेझ का वाटू लागली आहे याला अनेक कारणं आहेत. एकतर ज्या मुलांनी घरात फार माणसं पाहिलेली नाहीत किंवा ज्यांना नात्यांची आस आहे त्यांना आपल्या संसारात एकत्र कुटुंब असावं असं वाटत राहतं. याचं दुसरं कारण एकत्र कुटुंबात घरात मिळणारा पाठिंबा हेही आहे. आज नवरा बायको दोघांना नोकरी करावी लागते अशावेळी घरात कोणीतरी असण्याची किंमत काय असते हे आता त्यांना कळून आलं आहे. आजारपणात आपलेपणाने चौकशी करणारं किंवा आपल्या अनुपस्थितीत कुणीतरी घराकडे लक्ष ठेवणारं असेल तर बाहेरच्या जबाबदार्या किती निश्चिंतपणे पार पाडता येतात याची जाणीव आता नव्या पिढीला होऊ लागली आहे. आजवर एकत्र कुटुंब म्हणजे केवळ भांडय़ाला भांडं लागणं, स्वातंत्र्य गमावणं किंवा मनाप्रमाणे निर्णय न घेता येणं असंच चित्र रंगवलं गेलं होतं. (यात माध्यमांचा फार मोठा वाटा आहे!) पण आपली जबाबदारी झटकून न टाकणार्या नव्या पिढीतल्या काही शिलेदारांना कर्तव्य आणि भावना यांचा मध्य गाठायचा असेल तर एकत्र कुटुंबाशिवाय पर्याय नाही याची जाणीव झाली आहे.
आर्किटेक असलेली सुरभी म्हणते, ‘माझं बालपण एकतर शाळेत किंवा पाळणाघरात गेलं. कारण आई-बाबा दोघं नोकरी करायचे. आजी - आजोबांशी पटत नाही म्हणून त्यांच्यापासून आम्ही कायम दूर राहिलो पण जेव्हा माझ्या मैत्रिणी आजीच्या हातचा डबा आणायच्या किंवा त्यांच्या आजोबांबरोबर बागेत किंवा फिरायला जायच्या तेव्हा मला खूप एकटं वाटायचं. त्यामुळे मी ठरवलं की मला एकत्र कुटुंबात संसार करायचा आहे.