धन, संपत्ती, पैसा-अडका हे संपणार आहे, नाशिवंत आहे, कायम स्वरूपी नाही. याचं घडलेलं उदाहरण म्हणजे एका धनिकाच्या वाडय़ासमोर माझ लहानपणी दिवाळी सण साजरा व्हायचा तेव्हा फटाके उडविले जायचे. त्यामधील न उडालेले (फुसक्या) फटाके गोळा करून चार गरीब मुलांची दिवाळी साजरी व्हायची. पण तोच वैभवी वाडा धनिक कंगाल झाल्याने विक्रीला निघतो तेव्हा वाईट वाटतं आणि प्रश्न पडतो, असं का झालं? धनिकांनी उधळलं नसेल एवढं वैभव सूर्याने प्रकाशाच्या रूपानी उधळूनही त्याचा साठा संपलेला नाही मग धनिकच कंगाल का झाला तर सूर्याला अस्ताची जाण होती. आपण मवळणार आहोत म्हणूनच तो सकाळी वेगळा प्रकाश (उन्हं) देतो. दुपारी वेगळे उन्ह आणि सायंकाळी वेगळे पण धनिकाला वाटलं आपल वैभवाला अस्त नाही. अशी धनिकाची धारणा झाल्यानेच धनिकाचा वाडा विक्रीला निघाला. निसर्ग आपल्याला शिकवतो पण आपण शिकत नाही. हेच धनिकाच्या बाबतीत घडलं. शेवटी धन, संपत्ती हे सावलीसारखं क्षणिक आहे, एवढं गमक सर्वाना कळावे हीच इच्छा.