Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्यामची आई - रात्र नववी

श्यामची आई - रात्र नववी
मोरी गाय
"बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारीत होता. गाय दुस-याची असली तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा.' श्याम म्हणाला.
 
"तो बाहेर बसला आहे ऐकत, आत यावयास लाजतो आहे.' शिवा म्हणाला.
 
श्याम उठला व बाहेर आला. त्याने बारकूचा हात धरला. बारकू ओशाळला होता. तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता. श्याम त्याला म्हणाला, 'बारकू! तू मला आवडतोस, म्हणून तुला रागे भरलो. माझा इतका का तुला राग आला? मी तुझ्या भावासारखाच आहे. चल आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे.'
 
श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला. श्यामच्या गोष्टीची सारीजणे वाट पाहात होती. श्यामने सुरूवात केली:
 
"आमच्या घरी एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळयासमोर आहे. अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही, असे लोक म्हणत असत. खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती. कशी उंच थोराड होती. गंभीर व शांत दिसे. आमच्या वडिलांचा पाच शेरांचा लोटा होता. तो भरून ती दूध देई. तिची कास भरदार असे. तिची नीट काळजी घेण्यात येत असे.'
 
माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठयात जावयाची. मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालावयाची. मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी. गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे; परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही. तोंडदेखली गोपूजा आहे, देखल्या देवा दंडवत, असा प्रकार आहे. पूर्वी दुस-याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत. तिला भाकरी वगैरे देत. मूठभर चारा देत. आज दुसऱ्याच्या गाईस जरा अंगणात येऊ दे की, त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठया. दुसऱ्याची गाय दूर राहिली. स्वत:च्या घरच्या गाईलाही पोटभर वैरण, वेळेवर पाणी मिळत नाही. रानात, गावात जे मिळेल ते तिने खावे. कोठे घाणेरडे पाणी प्यावे. आज या गाईला आपण भीक मागायला लावले आहे म्हणून आपणांवर भीक मागावयाची पाळी आली आहे. जशी सेवा तसे फळ. गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल.
 
माझी आई मधून गोठयात जावयाची. तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजावयाची. त्याला धुवण म्हणतात. हे थंड व पौष्टिक असते. दुपारी जेवावयाचे वेळेत एक देवळातील गुरवाचा नैवेद्य व एक गाईसाठी, असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत. देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गाईचा गाईला नेऊन देण्यात येत असे. त्याला गोग्रास म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गोग्रास गाईला नेऊन देत असे. या मो-या गाईचे आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे व करवून घ्यावे. प्रेम दिल्याने दुणावते. आईला ती चाटावयाची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी, तसतशी मोरी गाय आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मो-या गाईचे दूध आईच काढीत असे. मोरी गाय दुस-या कोणाला काढू देत नसे.
 
ज्याने द्यावे त्याने घ्यावे, असा जणू तिचा निश्चय होता. दुसरे कोणी जर तिच्या कासेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाही. 'गंधेन गाव: पश्यन्ति.' गाई वासाने ओळखतात. तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी. ती गाय स्वत्ववती होती, सत्यवती होती, अभिमानी होती. प्रेम न करणाऱयाला ती लाथ मारी. 'पाप्या! माझ्या कासेला तू हात लावू नकोस; माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये, 'असे जणू ती सांगत असे.
 
ती मोरी गाय भाग्यवान होती, असे आम्ही समजत असू. जणू आमच्या घराची ती शोभाच होती. आमच्या घराची देवता होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य, स्नेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती. परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला. या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात. पटापट पाय आपटून गुरे मरतात. पायाला क्षते पडतात व त्यांत किडे होतात. एक दोन दिवसांत ढोर मरते.
 
मो-या गाईला पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले; परंतु गाय बरी झाली नाही. एका काडीसही ती शिवेना. मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले; परंतु आमची पुण्याई संपली होती. मोरी गाय आम्हास सोडून गेली! मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू! जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दु:ख कळते! इतरांस काय समज? मोरी गाय जेथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदकुंकू व फुले वाहात असे.
 
कधी कधी बोलताना आई म्हणे, 'मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे, फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारतमातेची मोरी गाय गेली. ज्या दिवसापासून गाईला भारतीय लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली, त्या दिवसापासून दु:ख, रोग, दारिद्रय, दैन्य, दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली. चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्यदेवता, आधारदेवता, या दोन देवतांची पूजा पुनरपि जोपर्यंत सुरू होणार नाही, तोपर्यंत तरणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गो-पूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहो. देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो. गाईलाही माता म्हणतो; परंतु तिला खायला प्यायला देत नाही; तिचे दूधही मिळत नाही; मिळाले तर रूचत नाही. खोटा वरपांगी नमस्कार करणाऱयाला नरक सांगितला आहे. दास्य सांगितले आहे.'

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्यामची आई - रात्र आठवी