Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्यामची आई - रात्र सत्ताविसावी

श्यामची आई - रात्र सत्ताविसावी
उदार पितृहृदय
आमच्या घरात त्या वेळी गाय व्याली होती. गाईच्या दुधाचा खर्वस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खर्वस फार आवडत असे. मी लहान होतो, तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खर्वस असला तर घेऊन येत असे. ती राधा गवळण पुढे लवकरच मेली.
 
"श्यामला खर्वस पाठविला असता, कोणी येणारे-जाणारे असते तर!" आई वडिलांना म्हणाली. वडील म्हणाले, "कोणी येणारे-जाणारे कशाला? मीच घेऊन जातो. घरच्या गाईच्या चिकाचा खर्वस. श्यामला आनंद होईल. उद्या पहाटे उठून मीच घेऊन जाईन. परंतु कशात देशील?" "त्या शेराच्या भांड्यात करून देईन. ते भांडेच घट्ट खर्वसाने भरलेले घेऊन जावे." आई म्हणाली. आईने सुंदर खर्वस तयार केला. खर्वसाची ती बोगणी घेऊन वडील पायी पायी दापोलीस यावयास निघाले.
 
शाळेला मधली सुट्टी झाली होती. कोंडलेली पाखरे बाहेर उठून आली होती. कोंडलेली वासरे बाहेर मोकळी हिंडत होती. शाळेच्या आजूबाजूस खूपच झाडी होती. कलमी आंब्याची झाडे होती. कलमी आंब्याच्या झाडाला फार खालपासून फांद्या फुटतात. त्या झाडाच्या फांद्या जणू जमिनीला लागतात. भूमातेला मिठी मारीत असतात. मधल्या सुट्टीत सूरपारंब्याचा खेळ आंब्याच्या झाडांवरून मुले खेळत असत. जणू ती वानरेच बनत व भराभर उड्या मारीत.
 
मुले इकडे तिकडे भटकत होती. कोणी घरून आणलेले फराळाचे खात होती. कोणी झाडावर बसून गात होती, कोणी फांदीवर बसून झोके घेत होती. कोणी खेळत होती, कोणी झाडाखाली रेलली होती, कोणी वाचीत होती, तर कोणी वर्गातच बसून राहिली होती. मी व माझे मित्र एका झाडाखाली बसलो होतो. आम्ही भेंड्या लावीत होतो. मला पुष्कळच कविता पाठ येत होत्या. जवळजवळ सारे नवनीत मला पाठ होते. संस्कृत स्तोत्रे, गंगालहरी, महिम्न वगैरे येत होती; शिवाय मला कविता करण्याचा नाद होता. ओव्या तर भराभर करता येत असत. ओवी, अभंग, दिंडी, साकी, यांसारखी सोपी वृत्ते क्वचितच असतील. ती अभिजात मराठी वृत्ते आहेत. मी एका बाजूस एकटा व बाकी सारी मुले दुसऱ्या बाजूस; तरी मी त्यांच्यावर भेंड्या लावीत असे. मला मुले थट्टेने बालकवी असे म्हणत.
 
आम्ही भेंड्या लावण्याच्या भरात होतो. इतक्यात काही मुले "श्याम, अरे श्याम" अशी हाक मारत आली. त्यांतील एकजण मला म्हणाला, "श्याम! अरे, कुणीतरी तुला शोधीत आहे. आमचा श्याम कोठे आहे, अशी चौकशी करीत आहे." इतक्यात माझे वडील माझा शोध करीत माझ्याजवळ येऊन ठेपलेही. मी विचारले, "भाऊ इकडे कशाला आलात? आता आमची घंटा होईल. मी घरी भेटलो असतो." वडिलांचा तो कसातरी गबाळ्यासारखा केलेला पोशाख पाहून मला लाज वाटत होती. इंग्रजी शिकणाऱ्या मुलांत मी वावरत होतो. जरी कशाचे मला महत्त्व कळू लागले नव्हते, तरी झकपक पोशाखांचे कळू लागले होते. सहा कोस चालून आलेल्या पित्याचे प्रेम मला दिसले नाही! मी आंधळा झालो होतो. शिक्षणाने हृदयाचा विकास होण्याऐवजी संकोचच होत होता. शिक्षणाने अंतरदृष्टी येण्याऐवजी अधिकच बहिर्दृष्टी मी होऊ लागलो होतो. वस्तूच्या अंतरंगात जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदयमंदिरातील सत्यदृष्टी दाखवीत नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे. ह्या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भल्य सृष्टी असते, तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अतिमहत्वाची, जीवनाला सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे. सहा कोस वडील चालून आले. का आले? तो खर्वस, ती एक खर्वसाची वडी मुलाला देण्यासाठी. किती प्रेम! त्या प्रेमाला कष्टही आनंदरूपच वाटत होते. खरे प्रेम तेच, ज्याला अनंत कष्ट, हाल व आपत्ती सुंदर आणि मधुर वाटतात! हे असले दिव्य प्रेम मला लहानपणी मिळाले होते. आज मी माझ्या आईबापांच्या त्या प्रेमातही दोष पाहीन. त्यांनी स्वतःच्या गावातील एखाद्या गरिबाच्या मुलाला खर्वस दिला असता तर? एखाद्या हरिजनाच्या मुलाला दिला असता तर? शेजारची मुले श्यामचीच रूपे यांना का न वाटावी? तमक्या आकाराचा, अमक्या रंगाचा, अमक्या नावाचा, असा विशिष्ट नामरूपात्मक मातीचा एक गोळा त्यांना आपलासा का वाटावा? परंतु ही थोर दृष्टी एकदम येत नाही. मनुष्य हळूहळू वाढत जातो. आसक्तिमय जीवनातून निरासक्त जीवनाकडे वळतो. माझे आईबाप मला अपरंपार प्रेम पाजीत होते, म्हणून थोडेतरी प्रेम मला आज देता येत आहे. माझ्यामधील प्रेमळपणाचे बी त्या वेळेस पेरले जात होते. त्याच बीजाचा हा अंकुर आहे. मला नकळत, त्यांनाही नकळत, माझे आईबाप माझ्या जीवनात माझ्या हृदयातील बागेत कोमल व प्रेमळ भावनांची रोपे लावीत होते. म्हणून आज माझ्या जीवनात थोडा आनंद आहे, थोडा सुगंध आहे, ओसाड नाही, रूक्ष, भगभगीत नाही. मुले मला हसतील. "ते का तुझे वडील? काय फेटा बांधला आहे, काय तो कोट!" असे म्हणून चिडवतील, ह्याचेच मला वाईट वाटत होते. वडिलांच्या हृदयाकडे मी पाहत नव्हतो. माझीच मला काळजी होती. माझ्याच प्रतिष्ठेच्या पूजेचा मी विचार करीत होतो. आपण सारे जण 'अहं वेद' असतो. आपण द्विवेदी नाही, त्रिवेदी नाही, चतुर्वेदी नाही. आपण सारे एकवेदी आहोत व त्या वेदाचे नाव आहे 'अहं!' सारखा आपलाच विचार आपण करीत बसतो. आपला मान, आपले सुख, आपली आढ्यता, आपली अब्रू, सारे आपलेच. आपणांस म्हणून मोठे होता येत नाही. जो स्वतःस विसरू शकत नाही, तो काय प्रेम करणार?" वडील म्हणाले, "श्याम! तुझ्या आईने तुला खर्वस पाठविला आहे. तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे. तो तू व तुझे मित्र खा व बोगणी परत द्या." त्यांनी खर्वसाची बोगणी मजजवळ दिली. इतर मुले माझ्याकडे पाहून फिदी फिदी हसत होती. मी शरमलो होतो. माझे वडील पुन्हा म्हणाले, "श्याम! अरे, बघत काय बसलास? टाक उरकून! लाजायला काय झाले? या, रे मुलांनो! तुम्हीही घ्या. श्यामला एकट्याने खावयाला लाज वाटत असेल. एकट्याने नाही तरी नयेच खाऊ. चारचौघांना द्यावे." इतर मुले निघून गेली. माझे मित्र फक्त राहिले. एक धीट मित्र पुढे आला. त्याने भांड्याचे फडके सोडले. "ये रे श्याम! या रे आपण फन्ना करू. फडशा पाडू." असे तो म्हणाला. आम्ही सारे खर्वसावर घसरलो. माझे वडील बाजूस जरा पडले होते. ते दमून आले होते. त्यांनी खर्वस घेतला नाही. आम्ही देत होतो, तर म्हणाले, "तुम्हीच खा. मुलांनीच खाण्यात गंमत आहे."
 
आम्ही सारा खर्वस खाऊन टाकला. फारच सुंदर झाला होता. थकलेल्या वडिलांचा जरा डोळा लागला होता. इतक्यात घण घण घंटा झाली. वडील एकदम जागे झाले. ते म्हणाले, "झाला, रे, खाऊन? आण ते भांडे. मी नदीवर घासून घेईन." ते भांडे मी तसेच त्यांच्याजवळ दिले. वडील जावयास निघाले. ते म्हणाले, "अभ्यास नीट कर, हो. प्रकृतीस जप. गाईचे वासरू चांगले आहे, पाडा झाला आहे." असे म्हणून ते गेले. आम्ही शाळेत गेलो.
 
मला माझी शरम वाटत होती; अशा प्रेमळ आईबापांचा मी कृतघ्न मुलगा आहे, असे माझ्या मनात येत होते. गोष्ट तर होऊन गेली; परंतु रुखरुख लागून राहिली. सहा कोस केवळ खर्वसाची वाटी घेऊन येणारे वडील व त्यांना पाठविणारी माझी थोर आई! या दोघांच्या प्रेमाचे अनंत ऋण कसे फेडणार? माझ्या शेकडो बहीणभावांना जर मी असेच निरपेक्ष प्रेम देईन, तर त्यानेच थोडे अनृणी होता येईल. येरव्ही नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्यामची आई - रात्र सव्विसावी