फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, एक छोटं गाव होतं. त्या गावातील लोक कष्टाळू आणि प्रामाणिक होते. असेल त्या परिस्थितीत ते समाधानाने राहत असत. याच गावात महादेव नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याला चार मुलगे होते. त्या चौघांचीही लग्न झालेली होती. ह्या चारही सून खूप चांगल्या होत्या. महादेवाची शेती होती. पोटभर अन्न मिळेल इतकं त्याचं उत्पन्न होते. खाऊन पिऊन सुखी लोक होते ते.पावसाळा जवळ आला की त्यांना खूप काम असतं. चारही मुलं महादेव बरोबर शेतात येत असत. महादेवाला आता वयोमाना नुसार काम होत नव्हतं. म्हणून तो थोडंसं काम करून देखरेख करीत असे. सकाळी लवकर उठून न्याहारी करून घरातली पुरुष माणसं शेतावर येत असत. घाम गाळून सर्व काम करत असत. दुपारी बारा वाजल्यानंतर चौघी सुना आपापल्या नवऱ्यांना जेवण घेऊन येत असत. मग एखाद्या मोठ्या झाडाखाली बसून ते सर्वजण आनंदाने चटणी, भाकरी, कांदा, मिरची असं जेवण करीत असत नंतर विहिरीचं गोड पाणी पिऊन थोडा वेळ तेथेच विश्रांती घेत. सुना घरी परत जात असत.
एके वर्षी पाऊस खूप कमी आला. शेतकरी चिंतेत होते. धरणाच्या पाण्यावर थोडी फार शेती करती होते. दुष्काळ पडू नये म्हणून देवाची प्रार्थना करीत होते. पावसासाठी खूप प्रयत्न करती होते. पाऊस पुरेसा येत नव्हता. दुष्काळाची टांगती तलवार प्रत्येकाच्या डोक्यावर होती.
महादेवही चिंतेत होता. त्याची बायको, सुना उपास तापास करीत होत्या. महादेवाची शंकरावर खूप भक्ती होती. तोही रोज सकाळी शंकराच्या देवळात जाऊन त्याची प्रार्थना करीत होता. सांब सदाशिव पाऊस दे. पण अजून तरी शंकराने त्याची हाक ऐकली नव्हती.
अशातच एक दिवस महादेवाचे एक लांबचे नातेवाईक अचानक त्यांच्या घरी आले. पाच सहा पुरुष आणि पाच सहा बायका होत्या. सुनांनी पाहुण्यांना बसायला घोंगडी अंथरली, गूळ पाणी दिलं. सर्वांची विचारपूस केली. महादेवच्या बायकोने सर्वांचे हसून स्वागत केले. पण मनातून ती काळजीत होती. इतक्या लोकांना जेवायला काय करायचे? घरात फक्त ज्वारी शिल्लक होती. पण तिला काही सुचतं नव्हते. तिने मोठ्या दोन सुनांना सांगितले, 'मागच्या दाराने शेतावर जा आणि ह्यांना विचारा, पाहुण्यांच्या जेवणाचं काय करायचं? '
सुना मागच्या अंगणात गेल्या. तेथून एका दरवाज्यातून बाहेर पडल्या. झप झप पाउले चालत त्या शेतावर पोहोचल्या. मामंजींना त्यांनी पाहुण्याबद्दल सांगितले. महादेवाने थोडा विचार केला आणि त्याने त्यांच्या जवळ बायकोला निरोप दिला की, 'एकाचे दोन, दोनाचे एक करा. '
सुनांना काहीच समजेना. त्या गोंधळून गेल्या, तेव्हा महादेव म्हणाला, 'तुम्ही तुमच्या सासूला हा निरोप सांगा. तिला समजेल. सुना घरी परतल्या. येताना त्या खूप विचार करीत होत्या पण मामंजींच्या शब्दाचा अर्थ त्यांना समजेना. घरी आल्यावर त्यांनी जसाच्या तसा निरोप सासूबाईंना सांगितला. सासूबाई हसल्या. म्हणाल्या, चला कामाला लागा. भराभरा त्यांनी मांडणीतले जोंधळ्याचे डबे काढले. चाळणीने चाळून निवडून घेतले. स्वयंपाक घरातील दोन तीन चूली लाकडे गालून पेटवल्या. मोठ्या कढईत तिघीजणी जोंधळ्याच्या लाह्या करू लागल्या. तोपर्यंत सासू आणि धाकटी सून पाहुण्यांशी गप्पा मारीत होत्या. घराच्या मागच्या विहिरीतील थोडं पाणी काढून त्यांनी पाहुण्यांना अंघोळी करायला सांगितल्या.
पाहुण्यांच्या अंघोळीत बराच वेळ गेला. नंतर महादेवाची बायको पाहुण्यांना म्हणाली, 'चला जेवण तयार होईपर्यंत देवळात जाऊन येऊ.' सर्वजण देवळात गेले. सासूबाई जाताना सांगून गेल्या होत्या. त्या प्रमाणे सुनांनी लाह्या फोडून त्याचे जेवण तयार केले होते. त्या सर्वांची वाट पाहत बसल्या. सासूबाईंनी बराच वेळ देवळात काढला आणि दुपारचे अडीच वाजल्या नंतर त्या घरी परतल्या. पाहुणे खूप भुकेले होते. सुनांनी भराभर पाटपाणी केलं. सर्वजण जेवायला बसले. पोटभर जेवले. विहिरीचे गोड पाणी गोड पाणी पिऊन खूश झाले. नंतर सुना आणि सासूबाई जेवायला बसल्या. पदार्थ चवदार झाले होते. त्यांनाही खूप भूक लागली होती. त्यांनी पोटभर जेवण केले. पाहुणे आता थकले होते. पथरी पसरून झोपून गेले.
सुना स्वयंपाकघर आवरीत होत्या. पण त्यांना अजून मामंजीच्या शब्दाचा अर्थ कळला नव्हता. तेव्हा त्यांनी हळूच सासूबाईंना अर्थ विचारला.
सासूबाई म्हणाल्या ऐका, 'एकाच दोन दोनाचे एक याचा अर्थ असा आहे की, घरात फक्त जोंधळे होते, म्हणजे एकच धान्य होते. त्याच्या लाह्या फोडून आपण दोन केले. आणि दोनाचे एक म्हणजे दोन वेळा जेवण करण्याऐवजी दुपारी उशिरा जेवण तयार करून ते दोन्ही जेवणा ऐवजी एकदाच दिले. पाहुणे रात्री जाणार आहेत पण पुन्हा जेवणार नाहीत. म्हणजेच दोनाचे एक केले'. सुना आपल्या सासू सासऱ्यांच्या चातुर्यावर खूष झाल्या.