एका तळ्यात एक कासव राहात होते. त्याचे दोन हंस मित्र होते. ते हंस आणि कासव रोज गप्पागोष्टी करीत असत. एकदा दुष्काळ पडल्यामुळे तळे आटून गेले. सगळे पशुपक्षी तो दुष्काळी भाग सोडून गेले. पण कासवाचे हाल होणार हे लक्षात आल्यानंतर हंस खूप दुःखी होतात. शेवटी कासव हंसाना एक उपाय सुचवतो, ''मी एक काठी आणीन. ती मधोमध मी तोंडाने पकडीन. तुम्ही त्या काठीच्या दोन्ही टोकांना चोचीने घट्ट पकडा आणि जवळपास कुठे पाण्याने भरलेले तळे असेल तेथे जाऊन राहू.'' त्याबरोबर हंस सांगतात, ''ठीक आहे तुझी कल्पना! आम्ही करू सर्व! पण तुझ्या बडबड्या स्वभावाची भीती वाटते. काही झालं तरी तोंड उघडायचं नाही. तोंड उघडलंस तर खाली पडून मरशील.''
ठरल्याप्रमाणे दोन्ही हंस कासवाला काठीच्या साहाय्याने उडत घेऊन जाऊ लागले. तेवढ्यात एका नगरातील लोकांचे या विचित्र पालखीकडे लक्ष गेले. ते आपापसात बडबडू लागले. गोंगाट वाढत गेला. हा गोंगाट ऐकून कासवाने हंसाला ''हा आवाज कसला?'' हे विचारण्यासाठी तोंड उघडले आणि खाली पडून कासव मरण पावले.
तात्पर्य : मित्राचा योग्य सल्ला न ऐकल्यास प्रसंगी जीवावर ही बेतते.