मी त्यावेळी महाराष्ट्रातील गडचिरोली या आदिवासी गावात एम.बी.बी.एस झाल्यानंतर इंटर्नशिप करत होतो. एम.बी.बी.एस झाल्यानंतर डॉक्टरीचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याआधी आम्हाला एक शपथ दिलेली होती. त्या शपथेचा मुख्य भाग म्हणजे 'मी डॉक्टरी हा कधीही व्यवसाय समजणार नाही. ते कर्तव्य समजून संपूर्ण जीवन मानवतेच्या सेवेसाठी अर्पण करीन' हा होता.
त्यानंतर मला किमान सहा महिने तरी सीनियर डॉक्टरचा असिसटंट म्हणून काम करायचं होतं. त्यांच्या हाताखाली सहा महिने काम केल्यानंतर ते माझी एक लेखी व एक प्रॅक्टिकल परीक्षा घेणार होते. त्यामध्ये पास झाल्यानंतरच मला डॉक्टरीचा स्वतंत्र व्यवसाय करायची परवानगी होती. सहा महिने उलटून गेले होते. उद्याच माझी परीक्षा होती. मी रात्री खोलीमध्ये अभ्यास करीत बसलो होतो. कारण त्या परीक्षेवरच माझं भवितव्य अवलंबून होतं. मी मन लावून अभ्यास करत होतो. इतक्यात खोलीचं दार ठोठावलं गेलं. बाहेर धो. धो. पाऊस पडत होता. इतक्या रात्री कोण असेल या काळजीनेच मी दार उघडलं. समोर एक म्हातारी आदिवासी बाई आपल्या वीस वर्षाच्या गरोदर मुलीला घेऊन आली होती. बहुतेक त्या बाईच्या मुलीच्या प्रसुतीची वेळ येऊन ठेपली होती.
म्हातारी बाई रडत होती. मला म्हणाली 'बेटा आता माझ्या मुलीला दवाखान्यामध्ये घेऊन जायला वेळ नाही. थोडा उशीर झाला तर माझी मुलगी मरून जाईल. आता तूच माझ्या मुलीला देवासारखा आहे. काही मदत कर' मला उद्याच्या परीक्षेचे टेन्शन होत तरीही मी म्हटलं 'आई तुम्ही काही काळजी करू नका. मला जे काही जमेल ते मी करीन. '
मी डिसेक्शन बॉक्समधून ब्लेड, चाकू, फोर्सेप, सीजर अशी उपकरणे काढली. माझे पुस्तकी ज्ञान व त्या म्हातार्या बाईच्या अनुभवाच्या आधारे आम्ही तिच्या मुलीची डिलिव्हरी केली.
डिलिव्हरी सुखरूप झाली होती. तिला मुलगा झाला होता. माझ्या रूममध्ये रक्ताचं थारोळं साचलं होतं. मी व त्या म्हातार्या बाईने मिळून रूम स्वच्छ केली. म्हातारीने आपल्या नातवाला न्हाऊ घालून स्वच्छ केलं. मी तिला काही जुने कपडे वा पाचशे रुपये बाळंतिणीसाठी दिले. म्हातार्या बाईची मुलगी माझ्याकडे कृतज्ञतेने पाहत होती. मी तिला म्हटलं 'तब्येतीची काळजी घे व मुलाच्या बारशाला तिच्या या मामाला अवश्य बोलव बरं'. म्हातारी बाई व तिची मुलगी माझे आभार मानून निघून गेली. तेव्हा सकाळचे पाच वाजले होते. सगळीकडे उजाडलं होत. या सगळ्या प्रकरणामुळे माझ्या आजच्या पेपरचा बेंडबाजाच वाजला होता.
आजच्या परीक्षेमध्ये पास होईन की नाही याचीच मला काळजी होती. पण मी डॉक्टरीच्या व्यवसाय सुरू करण्याच्या आधी मनुष्य जातीच्या सेवेची शपथ व व्रत घेतलं होत त्यात मी नक्कीच पास झालो असेल. असा माझा विश्वास होता.