आजही मला तो दिवस आठवतो! मी तेव्हा साधारण 10 वर्षांचा असेल, मला भेंडी खायला खूप आवडात असे. एके दिवशी बाबा ऑफिसातून लवकर घरी आल्यानंतर मी त्यांच्याकडे भेंडी आणण्याचा हट्ट धरला. दिवस मावळायला लागला होता. बाजारात भाजीपाला वाल्यांची आवराआवर सुरू झाली होती. अर्धा बाजार पालथा घातला परंतु भेंडी काही दिसत नव्हती.
उन्हाळ्याची नुकतीच सुरूवात असल्याने बाजारात भेंडीची आवक जेमतेम होती. काही मोचक्याच भाजीवालेच भेंडी ठेवत होते. तेवढ्यात आम्हाला आपचा नेहमीचा भाजीवाला रामभाऊ धावपळीत येताना दिसला. बाबांनी त्याला आवाज दिला. त्याच्या गाडीवर मला भेंडी दिसल्याने मला खूप आनंद झाला.
गाडीवर एका बाजुला थोडीच भेंडी ठेवली होती. बाबांनी त्याला भेंडीचा भाव न विचारताच तराजूमध्ये भेंडी टाकत त्याला सगळ्या भेंडीचे वजन करायला सांगितले. 'अहो, साहेब ऐका तर...!' असे रामभाऊचे शब्द कापत बाबांनी त्याला 'आधी भेंडीचे वजन कर मग बाकीच्या गोष्टी करू...!' असे सांगतिले.
त्याने मुकाटपणे वजन केलेली भेंडी पिशवीत टाकली. भेंडीचे वजन करताना बाबांना रामभाऊचे हात थरथर कापत होते, हे दिसले नाही. त्यानंतर आम्ही भेंडी घेऊन आनंदाने घरी गेलो. दुसर्या दिवशी सकाळीच रामभाऊ भाडी घेऊन आमच्या अंगणात येऊन उभा राहीला, तेव्हा मी खेळत होतो.
बाबांनी त्याला विचारले, 'काल बाजारात काल तुला काही सांगायचे होते रामभाऊ?' 'आता सांगून काय फायदा साहेब', असे रामभाऊने उत्तर दिले. 'अरे पण सांग तर काय झाले ते', असे बाबांनी म्हटल्यावर त्याने सांगितले, 'काल माझ्या पाच वर्षांच्या मुलाचा वाढ दिवस होता.
त्याने मला घरून निघताना आवर्जुन भेंडी आणायला सांगितले होते.' साहेब, मी आपल्याला भेंडी देण्यास नकार देऊ शकलो नाही.
त्यानंतर माझी घरी जाण्याची हिम्मतच होत नव्हती. घराजवळच्या पुलावर बराच वेळ बसल्यानंतर कुठे घरी गेलो. घरी पोहचताच बायकोने सांगितले, राजू भेंडीच्या भाजीसाठी खूप रडला व काहीच न खाता झोपून गेला. रामभाऊचे ते वाक्य आजही माझ्या कानात आहे. मी जेव्हा ही बाजारात जातो व गाडीवर भेंडी पाहतो. तर मला रामभाऊचा चेहरा आठवतो.