उपेनचा निर्णय झाला होता. ओंकारनाथांचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. "जन्माची ददात मिटेल". पण
त्यासाठी सरूला.....?, उपेनच्या मनात विचार आला.
- मग काय झालं, असाही तिचा काय उपयोग आहे आपल्याला..नशिबाने पैसा मिळण्याची संधी पदरात आणून
टाकली आहे, तिचा फायदा न घेण्याचा करंटेपणा कसा करावा. ऒंकारनाथांनी एवढ्या खात्रीने सांगितलंय...
त्याने खिशातून ओंकारनाथांनी लिहून दिलेलं ते चिटोरं काढलं. जीर्णं झालेला तो एक कागद होता. शंभर
सव्वाशे वर्षांपुर्वीचा. त्यावरचे बरेच शब्द आता पुसट झाले होते. पण ते वाचण्याची आवश्यकता नव्हती.
ऒंकारनाथांनी त्याला सर्व काही समजावून सांगितलं होतं. उपेनने शांतपणे घडी करून तो कागद खिशात ठेवून
दिला. तो झपाझप पाऊलं टाकत घराच्या दिशेने चालू लागला. जमल्यास आज रात्रीच त्याला काम उरकून
घ्यायचं होतं.
......
सुन्न मनानं सरू समोरच्या भिंतीकडे नजर लावून बसली होती. तिथेच त्या भिंतीच्या पलिकडे त्यांच्या नशिबाची
दारं उघडणारी किल्ली दडलेली होती. पण त्या नशिबाकडे नेणारा मार्ग भयंकर होता. भैरप्पाचे शब्द तिच्या
मनात घुटमळत होते. "पैसा मिळवण्यासाठी असलं काही करण्याची तिच्या मनाची तयारी नव्हती. तरीही मनात
सारखे तेच विचार येत होते. धोका पत्करलाच पाहिजे. तिचं मन तिला सांगत होतं. असंही या दरिद्री
जिण्याला काय अर्थ होता. देणेकर्यांची देणी चुकवता चुकवता पुरेवाट होत होती. देणेकर्यांना चुकवण्यासाठीच
गुपचुप घर बदलून या जुनाट वाड्यात रहायला आलो अन नशिबानं अलगद समोर सोन्यासारखी संधी आणून
ठेवली. तिचा लाभ आपण घेतला नाही, तर आपल्यासारखे करंटे आपणच.
-पण उपेनला किती त्रास होईल, त्याचा विश्वासघात?
तेवढ्यापुरतं त्याला वाटेल, आणि असंही नंतर तो कुठे असणार आहे आपल्याबरोबर. या विचारासरशी तिच्या
अंगावर शिरशिरी आली. कसला तरी निर्णय घेत ती लगबगीनं उठली.
आज रात्रीच आपला बेत तडीस न्यायचा, असा निर्णय तिनं घेतला.
........
उपेन आणि सरूनं वाड्यातली खोली घेतली आणि त्या प्रकाराला सुरूवात झाली. वाडा जुना असला तरी गावाच्या
मध्यवर्ती वस्तीत होता. मुख्य म्हणजे भाडं अगदी कमी होतं. बरेच रहिवासी वाडा सोडून गेले होते,
सरू-उपेन धरून तीन कुटुंबं सध्या तिथे वास्तव्यास होती. त्यांची खोली वाड्याच्या एका टोकाला होती.
-पहिल्याच रात्री त्यांना तो अनुभव आला.
त्यांची खोली म्हणजे भाडेकरूंसाठी एका मोठ्या खोलीचं दोन खणी घरात केलेलं रूपांतर होतं. खोलीच्या पुढ्च्या
भागातल्या एका बाजूकड्च्या भिंतीमध्ये एक मोठा कोनाडा केलेला होता. त्याची खोल्रीही बर्यापैकी म्हणजे तीन
साडेतीन फुट होती आणि उंची साधारणत: अडीच फुट. बारकाईने निरिक्षण केल्यावर असं लक्षात येत असे,
की तिथे एक दरवाजा होता. जो कोनाडा काढ्ल्याने कायमचा बंद करण्यात आला होता.
रात्री दीडच्या सुमारास त्या आवाजाने दोघांनाही जाग आली.
खूप खोल ठिकाणाहून यावा अशा पद्धतीचा तो आवाज होता. पण दोघांनाही तो स्पष्टपणे ऐकू आला.
"ए, मला काढ"
भीतीने दोघांच्याही अंगावर सरसरून काटा आला. उपेनने जवळ जाऊन कोनाड्याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न
केला.
पलिकडून पुन्हा तेच शब्द उमटले. दर पाच मिनिटांच्या अंतराने ती हाक येत राहिली. बरोबर अडीचला ते
शब्द येणं बंद झालं.
त्या रात्री दोघांनाही झोप लागणं शक्यच नव्हतं.
.....
वाड्यात गुप्तधन आहे, ज्योतिषी ऒंकारनाथांनी एका जीर्ण कागदावरचा मजकूर बघत सांगितलं.
काढलं तर सात पिढ्या बसून खातील, पण-
पण काय ?, उपेनने अधीर होवून विचारलं.
जो काढेल त्याला बळी जावं लागेल.
बळी? होय, सरूकडे भेदकपणे पहात भैरप्पा उत्तरला. जो स्वत: ते दार फोडेल त्याला जीव गमवावा लागेल, यात काही बदल संभवत नाही. काय करायचं ते तुम्ही ठरवा, असं म्हणून भैरप्पा निघून गेला. ....
घराकडे निघायला उपेनला साडेदहा वाजून गेले. पण त्याला आता वेळकाळाचं भान राहिलं नव्हतं. आजच्या आज
निकाल लावून टाकायच्या इराद्यानं तो झपाटला होता.
"सात पिढया बसून खातील इतकी संपत्ती.." त्याला दुसरं काही दिसेनासं झालं होतं, दुसरं काही ऐकू
येईनासं झालं होतं.
-प्रश्न सरूला कसं तयार करायचं हाच होता.
अर्थात आपण काहीतरी कारण काढून तिला कोनाडा फोडायला सांगितलं तरी ती विरोध करणार नाही याची
त्याला खात्री होती.
त्याच्या डोळ्यांत एक क्रूर चमक तरळून गेली. झपाझप पावलं टाकीत तो घराकडे निघाला.
.....
अकराच्या सुमारास उपेन घरापाशी पोहोचला. दार अर्धवट लोटलेलं होतं, त्यातून प्रकाशाची तिरीप बाहेर
जमिनीवर पडली होती. सरूशी कसं कसं बोलायचं यावर मुद्दे मनात घोळवत त्याने दरवाजा लोटला.
आतलं दृष्य पाहून त्याची नजर थिजली.
जमिनीवर सरूचा निष्प्राण देह पडला होता. तिचं सर्वांग हिरवं निळं पडलं होतं. कुठ्ल्याशा विषारी दंशाने
तिचा जीव घेतला होता. बाजुलाच एक चिटोरं पडलेलं त्याला दिसलं. उपेनने ते उचललं. सरूचंच हस्ताक्षर
होतं ते.
त्यात लिहिलं होतं,
"उपेन, मी तुला कधीच आवडत नव्हते. ही गोष्ट मला ठाऊक आहे. माझ्याकडून तुला कसलेच सुख देणे
झाले नाही. मुलाबाळांचेही नाही. जीव गमाविण्याचे मला काही वाटत नाही. किमान तुझं पुढील आयुष्य सुखात
जाईल."
-सरू.
बरं झालं, सुंठीवाचून खोकला गेला, उपेनच्या मनात विचार आला.
उपेनची नजर भिंतीकडे गेली. कोनाडा खोदण्याचा प्रयत्न सरूने केलेला दिसत होता. भिंतितली चौकट
फोडलेली होती. आतल्या कुबट हवेचा दर्प खोलीत भरून राहिला होता.
उपेनचे डोळे चमकू लागले.
"सात पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती.."
बेभान होवून तो पुढे सरसावला. कोनाड्यात चढून त्याने फोडलेल्या चौकटीवर लाथ मारली. आता आत
डोकावण्याइतकी सोय झाली होती. अधीर होवून त्याने आत डोकं घातल.
त्याच क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. श्वास जड होवू लागला, खोल खोल पाण्यात आपण गाडले
जातोय असं त्याला वाटू लागलं. मदतीसाठी हाक मारण्यासाठी त्याने तोंड उघडलं, पण आवाजच निघेना.
-पुढ्च्याच क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला. थोड्याशा झटापटीनंतर सारं कसं शांत शांत झालं.
.....
दुसर्या दिवसाच्या वर्तमानपत्रात बातमी होती, एका विचित्र घटनेत गावातील जुन्या वाड्यात एका जोडप्याचा मृत्यु झाला. पत्नीचां मृत्यु विषारी दंशाने, तर
पतीचा मृत्यु गुदमरल्याने झाल्याचे निदर्शनास आले आहे. याच घरात सुमारे एक कोटी रुपये किमतीचं सोनं
सापडलं......