Publish Date: Thu, 27 May 2021 (19:28 IST)
Updated Date: Thu, 27 May 2021 (19:29 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. विश्रांती घेतल्यानंतर कालपासून त्यांनी सक्रीय कामाला सुरुवात केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
बुधवारी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली आणि आज सकाळी खासदार संभाजीराजे यांनी भेट घेतली. शिवाय राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही भेट घेतली.
१ जून रोजी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर मंत्र्यांच्या कामाचा आढावा, राजकीय परिस्थितीवर चर्चाही करणार आहेत असे नवाब मलिक यांनी सांगितले.
शरद पवारसाहेबांनी सक्रीय कामाला सुरुवात केल्यामुळे पक्षाला आणखी उभारी मिळेल आणि ताकदही मिळेल असेही नवाब मलिक म्हणाले.
पश्चिम बंगाल निवडणूकीच्या आधी शरद पवारसाहेबांनी सर्व विरोधी पक्षांना एकजूट केले पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती त्याअनुषंगाने कामाला सुरुवात करणार आहेत. शिवाय आजच्या घडीला केंद्रसरकार ज्यापध्दतीने कोरोना परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरतेय. त्याचबरोबर संपूर्ण देशात लसीबाबत तुटवडा असताना त्याच्यावर पर्याय निघत नाहीय. खतांचा दर वाढवण्यात आला होता. त्यावर शरद पवार यांनी पत्र दिल्यावर केंद्राने तो निर्णय मागे घेतला असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.