Publish Date: Tue, 02 Mar 2021 (07:46 IST)
Updated Date: Tue, 02 Mar 2021 (07:53 IST)
मुंबई शहर आणि उपनगरात काही महिन्यांपूर्वी विद्युत पुरवठा विस्कळीत झाल्याच्या घटनेच्या चौकशीचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. चीनच्या सायबर हल्ल्यामुळे ही घटना घडल्याचा दावा न्यूयार्क टाइम्स या वृत्तपत्राने केला होता.
राज्य सरकार या नव्या दाव्यानुसारही या घटनेची चौकशी करणार आहे. याबाबत सायबर विभागाला निर्देश देणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत वीज पुरवठा खंडित झाला होता. यामुळे मुंबईतील लोकलसह सर्व काही ठप्प झाले होते. देशाच्या आर्थिक राजधानीवर हा मोठा आघात होता. या प्रकरणात आता थेट चीनचा हात समोर आला आहे. सायबर हल्ल्याद्वारे मुंबईला अडचणीत आणण्याचा हा उद्योग असल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. त्यामुळे चीन हा सीमेबरोबरच भारतातील शहरांना लक्ष्य करीत असल्याचेही यानिमित्ताने पुढे आले आहे.