Publish Date: Tue, 14 Jun 2022 (21:47 IST)
Updated Date: Tue, 14 Jun 2022 (21:59 IST)
साथीच्या आजाराचे रुग्ण घटले असून मृत्यू रोखण्यासही मुंबई पालिकेला यश आले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा जून महिन्याच्या मध्यपर्यंत एकाही साथीच्या आजाराचा रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पालिका आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० या एका वर्षात मलेरिया ५००७ रुग्ण सापडले होते त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. लेप्टोच्या २४० रुग्णांपैकी ८ मृत झाले. डेंग्यूच्या १२९ रुग्णांपैकी ३ मृत झाले. कावीळच्या २६३ रुग्ण सापडले. तर चिकूनगुणीयाचा एकही रुग्ण सापडला नाही. स्वाईन फ्ल्यूचे ४४ रुग्ण, गॅस्ट्रोचे २५४९ रुग्ण सापडले होते.
दिलेल्या आकडेवारीनुसार २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये १ हजार ६०२ रुग्णांची वाढ झाली तर मृत रुग्णांच्या संख्येत एकाने वाढ झाली. तसेच, २०२२ मधील जूनपर्यंतच्या आकडेवारीची तुलना मागील दोन वर्षातील साथीच्या आजारांनी त्रस्त रुग्णांशी व मृत रुग्ण संख्येशी केल्यास सन २०२० च्या तुलनेत यंदा रुग्ण संख्या ४,३०१ ने कमी आहे. तसेच, सन २०२१ च्या तुलनेत यंदा रुग्ण संख्या ५,८०३ ने कमी आहे. तर गेल्या दोन वर्षात मिळून एकूण २५ रुग्णांचा साथीच्या आजारांमुळे मृत्यू झालेला आहे. तर यंदाच्या वर्षी १ जानेवारी ते १२ जूनपर्यंतच्या कालावधीत साथीच्या आजारांमुळे अद्याप एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.